आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला विक्रमी यश लाभेल, याविषयी भाजपचे सर्वोच्च नेते लालकृष्ण अडवाणी यांची खात्री पटली आहे. महागाई आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण राखण्यात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकार सपशेल अपयशी ठरल्यामुळे देशातील राजकीय वातावरण भाजपसाठी पूर्णपणे अनुकूल बनले आहे. भाजपसाठी एवढी अनुकूल परिस्थिती यापूर्वी कधीही  नव्हती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजप पूर्वीचे सर्व विक्रम मोडीत काढेल, असा विश्वास अडवाणी यांनी व्यक्त केला.
भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे उद्घाटन करताना अडवाणी बोलत होते. एका वृत्तवाहिनीने केलेल्या जनमत चाचणीच्या निष्कषार्ंचा दाखला देत भाजपच्या विजयाचा त्यांनी दावा केला. सामान्यपणे निवडणूक सर्वेक्षणांचे निष्कर्ष भाजपच्या बाबतीत पूर्वग्रहदूषित असतात. पण यावेळी भाजपचाच विजय होईल, असे जनमत चाचण्यांमधूनही निष्पन्न होत असल्याबद्दल अडवाणी यांनी आनंद व्यक्त केला.
भाजपच्या निवडणूक प्रचार समितीच्या अध्यक्षपदी नरेंद्र मोदी यांची नियुक्ती केल्यामुळे नाराज झालेल्या अडवाणींमध्ये पुन्हा उत्साह संचरला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा विजय व्हावा म्हणून गेल्या तीन वषार्ंपासून काँग्रेस प्रयत्न करीत आहे. भ्रष्टाचार आणि महागाईसाठी जबाबदार ठरलेल्या यूपीए सरकारमुळे राजकीय वातावरण पूर्णपणे भाजपच्या बाजूने झुकले आहे, असे मत अडवाणी यांनी व्यक्त केले.  हवामान तसेच इतर घटक विचारात घेता लोकसभेची मुदतपूर्व निवडणूक व्हावी, असे निवडणूक आयोगाला वाटेल. यूपीए सरकारही मुदतपूर्व निवडणुकीला सामोरे जाऊ शकते. अर्थात, निवडणूक केव्हाही झाली तरी त्यासाठी सज्ज असणे आवश्यक असून कार्यकर्त्यांंनी कठोर परिश्रम करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
टूजीप्रकरणी अनिल, टिना अंबानी यांना न्यायालयाचे समन्स
पीटीआय, नवी दिल्ली
टूजी स्पेक्ट्रमप्रकरणी रिलायन्स एडीए समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी आणि त्यांच्या पत्नी टिना अंबानी यांना पुढील महिन्यात साक्ष देण्यासाठी हजर राहण्याबाबतची नोटीस दिल्ली उच्च न्यायालयाने शनिवारी बजावली. अनिल अंबानी यांना २२  तर टिना यांना २३ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
विशेष न्या. ओ. पी. सैनी यांनी साक्ष नोंदवून घेण्यासाठी या दोघांना नोटीस पाठविली आहे. या दोघांव्यतिरिक्त रिलायन्स एनर्जीचे अधिकारी अनिता गोखले आणि कमलकांत गुप्ता, सीएफएसएल तज्ज्ञ दीपक हांडा आणि विजय वर्मा यांनाही हजर राहण्याबाबत न्यायालयाने नोटीस पाठविली आहे.
सीबीआयने १९ जुलै रोजी अनिल आणि टिना अंबानी यांना साक्षीसाठी बोलावण्याबाबत न्यायालयात अर्ज केला होता. स्वान टेलिकॉममध्ये अनिल अंबानी यांनी आपल्या कंपनीमार्फत ९९० कोटी रुपयांपेक्षा अधिक बेकायदेशीर गुंतवणूक केल्याच्या प्रकरणी अंबानी दाम्पत्य अधिक प्रकाश टाकू शकतील, असे सीबीआयने आपल्या अर्जात म्हटले होते. स्वान टेलिकॉम आणि त्यांचे मालक शाहिद उस्मान बलवा आणि विनोद गोएंका यांच्यावर या प्रकरणी खटला सुरू आहे. अनिल अंबानी यांना २६ जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याबाबत सांगण्यात आले होते. मात्र आपल्या व्यस्त वेळापत्रकामुळे अनिल अंबानी यांनी हजर न राहण्याबाबत सवलत मागितली होती.