कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपा १३० पेक्षाही जास्त जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष म्हणून विजयी होईल, त्यामुळे इतर कोणत्या पक्षाकडून पाठिंबा घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही असा विश्वास भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. बंगळुरुत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका करत काँग्रेसच्या काळात कायद्याचे तीनतेरा वाजले असल्याचं म्हटलं.

काँग्रेस लोकशाहीच्या विरोधात जात ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. राजराजेश्वरी नगर येथे सापडलेल्या बनावट मतदार ओळखपत्रांवरुन काँग्रेस निवडणूक जिंकण्यासाठी कोणत्या स्तराला जाऊ शकतं हे आपणं पाहिलं आहे. ज्यांच्या नावे बनावट ओळखपत्रं बनवण्यात आली आहेत त्यांना मला अलर्ट करायचं आहे की, काँग्रेसच्या जाळ्यात अडकून निवडणुकीवर परिणाम होऊ देऊ नका असं आवाहन अमित शाह यांनी केलं आहे.

अमित शाह यांनी यावेळी सिद्धरमय्या यांच्यावर टीका करताना पराभवाच्या भीतीने ते दोन जागी उभे आहेत असा टोला मारलाय सोबतच जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

पुढे ते म्हणाले की, “एकवेळ आम्ही पराभव स्विकारु मात्र सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया आणि पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडियाची मदत घेणार नाही. काँग्रेस निवडणूक जिंकण्यासाठी त्यांचा पाठिंबा घेऊ शकतं आणि हाच त्यांच्यातील आणि आमच्यातील फरक आहे. काँग्रेस देशद्रोहींचा पाठिंबा घेताना मागे पुढे पहात नाही”.