स्वामींची नवी मागणी; अरुण जेटलींकडून आर्थिक सल्लागारांचा बचाव रिझव्र्ह बँकेचे गव्र्हनर रघुराम राजन यांना हटविण्यात यशस्वी ठरल्यानंतर खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांच्याकडे मोर्चा वळविला असून त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी अरविंद सुब्रमण्यन यांच्या अनेक निर्णयांबाबत नाराजी व्यक्त करताना त्यांच्यावर टीका केली. स्वामी यांच्या या वक्तव्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली आणि भाजपने सारवासारव केली आहे. भाजपने हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे म्हटले आहे. तर जेटली यांनी अरविंद सुब्रमण्यन सरकारसाठी अत्यंत महत्त्वाची व्यक्ती असल्याचे स्पष्ट केले आहे. स्वामी यांच्या या वक्तव्यानंतर प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना जेटली म्हणाले की, पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांच्यावर सरकारचा पूर्ण विश्वास आहे. वेळोवेळी त्यांच्याकडून मिळणारे सल्ले आमच्यासाठी अतिशय मोलाचे आहेत, असे स्पष्ट करताना जेटलींनी स्वामींचे वक्तव्य फेटाळून लावले. भाजपचे राष्ट्रीय सचिव श्रीकांत शर्मा यांनी स्वामींच्या वक्तव्याशी पक्ष सहमत नसल्याचे सांगितले. तसेच स्वामी यांचे हे वक्तव्य वैयक्तिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अरविंद सुब्रमण्यन हे ‘आयएमएफ’चे माजी अर्थशास्रज्ञ असून त्यांची २०१४मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. वस्तू व सेवा विधेयकाबाबत काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेमागे अरविंद सुब्रमण्यन यांचाच हात असून अशी व्यक्तींचा सरकारच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो असा आरोप करताना स्वामी यांनी पंतप्रधानांच्या निर्णयक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काँग्रेसची टीका सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या वक्तव्याबाबत काँग्रेसने जोरदार टीका केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेटली यांना अर्थमंत्रिपदावरून हटवून स्वामी यांना तेथे बसवावे अशी मागणी केली आहे. स्वामींच्या वक्तव्यानंतर देश कोण चालवत आहे, असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे.