करोनाचे संकट सरकार ज्याप्रकारे हाताळत आहे, त्यावर वाढती टीका होत असतानाच फेसबुकने ‘रिझाइन मोदी’ या हॅशटॅगला टॅग केलेल्या पोस्ट्स ब्लॉक केल्या, मात्र नंतर ही चूक असल्याचे सांगून त्या पूर्ववत केल्या. बुधवारी करण्यात आलेले हे ब्लॉकिंग सरकारच्या सांगण्यावरून केले नव्हते, असे फेसबुकने सांगितले.

सरकारच्या कोविड-१९ चे संकट हाताळण्यावर टीका करणारा मजकूर काढून टाकणारी फेसबुक ही पहिली समाजमाध्यम कंपनी नाही. सरकारच्या मते खोट्या बातम्या असलेला अशाच प्रकारचा टीकात्मक मजकूर ट्विटरने सरकारच्या आदेशान्वये हटवला होता.

‘हा हॅशटॅग आम्ही चुकून तात्पुरता ब्लॉक केला; मात्र भारत सरकारने आम्हाला तसे सांगितले म्हणून नव्हे. आता तो पुन्हा बहाल करण्यात आला आहे’, असे फेसबुकच्या एका प्रवक्त्याने गुरुवारी एका निवेदनात सांगितले. मात्र त्याने याचा तपशील दिला नाही.

‘सरकारने हा हॅशटॅग काढून टाकण्याचे कुठलेही निर्देश दिलेले नाहीत. तो चुकीने हटवला गेल्याचे फेसबुकनेही स्पष्ट केले आहे’, असे इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने एका ट्वीटमध्ये सांगितले.

वृत्तांनुसार, पंतप्रधान मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी करणारा एक हॅशटॅग बुधवारी फेसबुकने काही तासांसाठी ब्लॉक केला. या हॅशटॅगचा शोध घेणाऱ्या वापरकत्र्यांना एक संदेश मिळत होता. अशा पोस्ट्स ‘येथे तात्पुरत्या लपलेल्या आहेत’, कारण त्यांतील काही मजकूर आमच्या सामुदायिक निकषांच्या विरोधात आहेत, असे या संदेशात म्हटले होते.

फेसबुक अधूनमधून निरनिराळ्या कारणांसाठी हॅशटॅग आणि मजकूर ब्लॉक करत असते. यापैकी काही मॅन्युअली केले जाते, तर काही आपसूक होते.

कोविड संसर्गाची दुसरी लाट हाताळण्याच्या मुद्द्यावरून देशातील आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. देशात करोनाबाधितांची संख्या गुरुवारी १.८ कोटीहून अधिक झाली.