दक्षिण कोलकातामधील माजेरहाट पूलाचा काही भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला असून १९ जण जखमी झाले आहेत. बेहाला – इकबालनगरला जोडणाऱ्या या पुलाचा एक भाग कोसळला असून अनेकजण खाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा पूल ६० वर्षा जुना आहे. पुलाखाली अनेक दुचारकी आणि चारचाकी गाड्या उभ्या होत्या. यामधील अनेक गाड्या ढिगाऱ्याखील दबल्या गेल्या असून त्यात अनेकजण अडकल्याची भीती आहे. सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, सहा जणांना बाहेर काढण्यात यश मिळालं असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

घटनास्थळी बचाव पथकासहित रुग्णवाहिका उपस्थित आहेत. सोबतच जवळच लष्कराचं रुग्णालय असल्याने त्यांची मदत घेतली जात आहे. विवेकानंद फ्लायओव्हर दुर्घटनेच्या दोन वर्षांनी ही दुर्घटना झाली आहे. दोन वर्षांपूर्वी कोलकातामध्ये निर्माणधीन विवेकानंद फ्लायओव्हर कोसळला होता. या दुर्घटनेत २० जणांचा मृत्यू झाला होता.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पोलीस दुर्घटनेची चौकशी करतील, मात्र सध्या आमचं लक्ष फक्त बचावकार्यावर असल्याचं सांगितलं आहे. ‘आम्ही चिंताग्रस्त आहोत. बचाव पथकाकडून आम्ही प्रत्येक अपडेट घेत आहोत’, असं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं आहे. सध्या ममता बॅनर्जी दार्जिलिंगमध्ये आहेत.

दरम्यान राज्य सरकारचे मंत्री फिरहाद हकीम यांनी बचावकार्य संपलं असून कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याचं सांगितलं आहे. सोबतच सर्च ऑपरेशन सुरु असल्याचंही ते बोलले आहेत.