जगभरात करोनाचा फैलाव झालेला असताना त्याला नियंत्रणात कसं आणायचं? याच विवंचनेत सर्व राष्ट्र आहेत. मात्र, ब्रिटनमध्ये चित्र वेगळं आहे. “येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत ब्रिटन करोनामुक्त झाला असेल”, असा दावा ब्रिटनच्या लसीकरण टास्क फोर्सचे मावळते अध्यक्ष क्लाइव्ह डिक्स यांनी केला आहे. इंडियन एक्स्प्रेसनं टेलिग्राफच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. “ऑगस्ट महिन्यापर्यंत युकेमध्ये करोनाचा प्रसार थांबलेला असेल”, असं देखील त्यांनी सांगितलं. ब्रिटनमध्ये फायझर आणि मॉडेर्नासोबतच काही प्रमाणात ऑक्स्फोर्डने विकसित केलेल्या कोविशिल्ड लसीचे डोस दिले जात आहेत. या पार्श्वभूमीवर ब्रिटनकडून करण्यात आलेला हा दावा समस्त जगासाठीच एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल.

जगभरात करोनाचा होत असलेला प्रसार अद्याप आटोक्यात आलेला नसताना ब्रिटनने अशा प्रकारे दावा करणं ही महत्त्वाची बाब ठरली आहे. क्लाइव्ह डिक्स यांनी सांगितल्यानुसार, युकेमध्ये आत्तापर्यंत ५ कोटी १० लाख नागरिकांना लसीकरण पूर्ण झालं आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत युकेमधल्या प्रत्येकाला करोना लसीचा किमान एक डोस तरी दिला गेलेला असेल. त्यामुळे तोपर्यंत ब्रिटनने आपल्या सर्व लोकांना सध्या माहिती असलेल्या करोनाच्या सर्व प्रकारांपासून संरक्षित केलेलं असेल. देशातल्या तरुण लोकसंख्येपैकी किमान अर्ध्या लोकसंख्येला लसीकरण करून ब्रिटन या गटासाठी सर्वात वेगाने लसीकरण करणारा दुसरा देश ठरला आहे.

भारतात काय परिस्थिती?

जगभरात लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भारतात देखील वेगाने लसीकरणाची मोहीम राबवली जात आहे. मात्र, लसीच्या उपलब्धतेमुळे लसीकरण मोहिमेमध्ये अडथळे येत असल्याचं दिसत आहे. केंद्र सरकारने नुकत्याच दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात आत्तापर्यंत १७.३५ कोटींहून अधिक डोस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत पुरवण्यात आले आहेत. भारताच्या लोकसंख्येच्या मानाने ही संख्या १५ टक्क्यांच्या जवळपास असल्यामुळे हा आकडा मोठा मानला जात आहे. मात्र, भारतात लसीकरणापेक्षाही जनतेनं करोनाचे नियम पाळणं जास्त महत्त्वाचं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

आपण कशी रोखू शकतो करोनाची तिसरी लाट? केंद्र सरकारच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागारांनी सांगितला मार्ग!

केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी तिसऱ्या लाटेचा भारत सामना कसा करू शकेल? याविषयी भूमिका मांडली आहे. “जर आपण कठोर पावलं उचलली, तर तिसरी लाट कदाचित कुठेच येणार नाही. आपण स्थानिक पातळीवर, राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर आणि शहर पातळीवर करोनाबाबतचे नियम किंवा मार्गदर्शक सूचना किती प्रभावीपणे अंमलात आणतो, यावर हे अवलंबून असेल. नियमांची स्थानिक पातळीवर प्रभावी अंमलबजावणी करणं आवश्यक आहे”, असं ते म्हणाले आहेत. त्यामुळे भारतात लसीकरणासोबतच नियमांची कठोर अंमलबजावणी हे देखील करोना नियंत्रणात आणण्याचं महत्त्वाचं साधन ठरणार आहे.