लंडन : युरोपीय समुदायातून ब्रिटन शुक्रवारी बाहेर पडल्यानंतर आता ब्रिटन व भारत यांच्यातील व्यापार संबंध अधिक व्यापक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डिसेंबरपासूनच ब्रेग्झिटचा अंतिम टप्पा दृष्टिपथात आला असताना ब्रिटन व युरोपीय समुदाय यांच्यातील व्यापार थंडावला होता. आता ब्रिटनने त्यांच्या उद्योगांना व्यापार करार व भागीदाऱ्या करण्यासाठी स्वातंत्र्य दिले असून भारतीय व ब्रिटिश उद्योजकांना एकमेकांच्या देशात गुंतवणूक करण्याची ही मोठी संधी मानली जात आहे. दोन्ही देशात व्यापार व आर्थिक भागीदारी यातून वाढली आहे. कोब्रा बिअरचे संस्थापक व ब्रिटिश उद्योग महासंघाचे उपाध्यक्ष लॉर्ड करण बिलीमोरिया यांनी सांगितले की, भारत व ब्रिटन यांचे व्यापारी संबंध मजबूत आहेत, पण आता दोन्ही देशांना अधिक संधी उपलब्ध होणार आहे. ब्रिटिश आस्थापने भारतात गुंतवणुकीसाठी कंपनी कर आणखी कमी होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तसे झाले तर ब्रिटिश उद्योगांची भारतातील गुंतवणूक वाढू शकते.