Budget 2019: आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने शेतकऱ्यांना मोठी भेट दिली असून अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सहा हजार रुपये थेट जमा केले जातील, अशी घोषणा अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे. १२ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

पीयूष गोयल यांनी शुक्रवारी लोकसभेत हंगामी अर्थसंकल्प सादर केला. शेतकऱ्यांसाठी मध्य भारतातील विधानभा निवडणुकांतील पराभवाचे प्रमुख कारण ठरलेल्या शेतकरी असंतोषावर उपाय म्हणून केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली. अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये जमा होणार आहे. २ हेक्टर जागा असलेल्या शेतकऱ्यांना तीन टप्प्यात हे पैसे दिले जातील. या योजनेसाठी केंद्र सरकारने वर्षाला ७५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

शेतकऱ्यांच्या हितासाठी २२ पिकांचे हमीभाव दीड पटांनी वाढवण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतल्याचे त्यांनी सांगितले.