माझ्या मुलीला जसं त्यांनी जाळून मारलं, तसंच त्या आरोपींनाही जाळा अशी मागणी हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील मृत मुलीच्या आईने केली आहे. सध्या देशभरात वेगवेळया ठिकाणी या घटनेवर संताप व्यक्त होत असून आरोपींना कठोरात कठोर शासन करण्याची मागणी होत आहे “माझ्या मुलीला जसं त्यांनी जाळून मारलं तसंच त्यांना सुद्धा जाळून मारा” असं मृत मुलीच्या आईने वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं आहे.

मृत मुलीच्या आईने अखेरच्या क्षणी मुलीबरोबर काय बोलणे झाले त्या आठवणी सांगितल्या. “घरच्या वाटेवर असताना तिला खूप भूक लागली होती. त्यामुळे तिने मला फळे कापून ठेवायला सांगितली होती. दुचाकीचा टायर पंक्चर झाले आहे किंवा काय? याबद्दल तिने मला काहीही सांगितले नाही. मी जेवण बनवून घरी तिची वाट पाहत होते” असे पीडित मुलीच्या आईने सांगितले.

बलात्काराची ही घटना म्हणजे क्रूरतेचा कळस आहे. आरोपींनी कामावरुन घरी परतणाऱ्या महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या केली. नंतर निर्जन स्थळी नेऊन तिचा मृतदेह जाळला. राष्ट्रीय महामार्ग ४४ वरील चट्टनपल्ली गावात एका पूलाखाली आरोपींनी मृतदेहाची विल्हेवाट लावली. मृतदेह पेटवल्यानंतर आरोपी तिथून निघून गेले व पुन्हा काही वेळाने मृतदेह पूर्णपणे जळाला आहे की, नाही ते पाहण्यासाठी तिथे परत आले होते. पोलीस तपासातून ही माहिती समोर आली आहे.