उत्तर प्रदेशच्या चित्रकूटमध्ये चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने प्रवाशांनी भरलेली बस उलटल्याची घटना घडली आहे. ही बस चित्रकूटहून अलहाबादकडे निघाली होती अशी माहिती आहे. अपघातग्रस्त बसमधून 64 प्रवासी प्रवास करत होते, त्यापैकी 35 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मिर्झापूर झांसी राष्ट्रीय महामार्गावरील भौरी गावाजवळ हा अपघात झाला. सर्व प्रवासी हे बिहारमधील तीर्थयात्री होते आणि मेहर(मध्य प्रदेश)मधून शारदा मातेचं दर्शन घेऊन परतताना हा अपघात झाला आहे. दरम्यान, बसचा चालक फरार झाल्याचं वृत्त आहे. सुदैवाची बाब म्हणजे या अपघातात कोणीही मृत्यूमुखी पडल्याचं अद्याप वृत्त नाही. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.