भ्रष्टाचार आणि औचित्यभंगाच्या आरोपांवरून राजीनामा द्यावे लागलेले रेल्वे मंत्री पवनकुमार बन्सल आणि विधी व न्याय मंत्री अश्वनीकुमार यांच्या मंत्रालयांचा अतिरिक्त कार्यभार शनिवारी केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री सी. पी. जोशी आणि दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांच्याकडे सोपविण्यात आला. शुक्रवारी रात्री बन्सल यांच्यापाठोपाठ अश्वनीकुमार यांनाही राजीनामा द्यावा लागला होता.
जोशी हे शनिवारी परदेश दौऱ्यासाठी रवाना होणार होते. पण त्यांना थांबवून रेल्वे मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली. किरकोळ क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्याच्या निर्णयावरून गेल्यावर्षी ममता बनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर मुकुल रॉय यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या रेल्वे मंत्रालयाची जबाबदारीही जोशी यांच्याकडेच सोपविण्यात आली होती. यूपीए-२ मध्ये आतापर्यंत चार वर्षांत चार रेल्वे मंत्री बदलले गेले आहेत. सर्वोच्च न्यायालयासाठी कोळसा खाणवाटप घोटाळ्याचा अहवाल तयार करणाऱ्या सीबीआयच्या कामकाजात हस्तक्षेप केल्याच्या आरोपावरून अश्वनीकुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या मंत्रालयाची सूत्रे सिब्बल यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
गेल्या चार वर्षांत विधी व न्याय मंत्रालयाचे वीरप्पा मोईली, सलमान खुर्शीद आणि अश्वनीकुमार असे तीन मंत्री बदलले गेले आहेत.

सोनिया-राहुल यांना श्रेय!
सोनिया आणि राहुल गांधी कधीही भ्रष्टाचार खपवून घेत नाहीत. त्यामुळेच त्यांनी दोन मंत्र्यांना राजीनामे देण्यास भाग पाडले, असा दावा पक्षाचे प्रवक्ते भक्तचरण दास यांनी केला.

आता वहानवटी आणि अधिकाऱ्यांवर पाळी?
दोन केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्यांमुळे मनमोहन सिंग सरकार प्रतिमा डागाळल्यानंतर आता या घटनांसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. अटर्नी जनरल गुलाम वहानवटी, पंतप्रधानांच्या कार्यालय तसेच कोळसा मंत्रालयाच्या संयुक्त सचिवांनाही कारवाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.