संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे वृत्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडलेल्या मंत्रालयांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी अनेक बैठका घेतल्या आहेत. विशेषत: या बैठका करोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेदरम्यान घेण्यात आल्या. आज (शुक्रवारी) संध्याकाळी गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासमवेत पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या बैठकीत मंत्र्यांच्या कामगिरीच्या आढावा घेण्यात आला. सुत्रांच्या माहितीनुसार यामध्ये मोठ्या बदलांचे संकेत देण्यात आले. याबाबत अजून केंद्राने अधीकृत माहिती दिलेली नाही.

उत्तर प्रदेशसह पुढील वर्षी होणाऱ्या महत्त्वपूर्ण विधानसभा निवडणुकांसाठी मोदी सरकार जोमाने तयारी करत आहे. तसेच येत्या काही दिवसांत मोठी सामाजिक योजना जाहीर करण्याचीही चर्चा आहे. पंतप्रधानांनी गुरुवारी आपल्या ७ लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी पाच मंत्रालयांसमवेत ७ मंत्रालयांची बैठक घेतली. यामध्ये करोना संकटाच्यावेळी मंत्रालयाने केलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. दरम्यान धर्मेंद्र प्रधान, प्रकाश जावडेकर आणि हरदीप पुरी उपस्थित होते.

उत्तर प्रदेशात राजकीय घडामोडींना वेग!

उत्तर प्रदेशमध्ये सध्य राजकीय घडामोडींना काहीसा वेग आल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली असून या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभरापेक्षा अधिक काळ चर्चा झाल्याचे समोर आले आहे. याशिवाय भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी देखील योगी आदित्याथ यांची भेट होणार आहे. पंतप्रधान मोदींची भेट घेण्यासाठी योगी आदित्यनाथ हे पंतप्रधानांच्या निवास्थानी गेले होते. या दोघांमध्ये उत्तर प्रदेशातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नेमकी काय महत्वपूर्ण चर्चा झाली? याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.

हेही वाचा- भाजपाच्या बंगालमधील पराभवानंतर काय म्हणाले होते प्रशांत किशोर?

मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल काहीसे नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. तसेच, करोना महामारीला तोंड देण्यात उत्तर प्रदेश सरकारला अपयश आल्याचेही बोलले जात आहे. यावरून देखील योगी सरकारच्या कारभाराबाबत प्रश्न निर्माण केल जात आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरूवारी गृहमंत्री अमित शाह यांची देखील भेट घेतली व त्यांच्यात जळपास दीड तास चर्चा झाली. उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीस आता वर्षभरापेक्षाही कमी कालावधी उरला आहे, त्यामुळे भाजपाने आता संपूर्ण लक्ष पक्ष बळकटी करणावर केंद्रीत केल्याचे दिसत आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला उत्तर प्रदेशच्या जनतेची नाराजी ओढावून घेणे परवडणार नाही. त्यामुळे या राजकीय हालचालींना वेग आल्याचेही बोलले जात आहे.