आसामचे आरोग्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी कर्करोगाबाबत मुक्ताफळे उधळून नवा वाद निर्माण केला आहे. पूर्वी केलेल्या वाईट कृत्यांमुळेच लोकांना कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. हा एक प्रकारचा दैवी न्यायच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हेमंत विश्व शर्मा यांच्या विधानावर सर्वच स्तरातून टीका होत आहे.

गुवाहाटीमध्ये शिक्षकांना नेमणूकपत्र वाटपाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात हेमंतविश्व शर्मा यांनी कर्करोग का होतो याचे कारण सांगून उपस्थितांना धक्काच दिला. देव आपण केलेल्या पापांची शिक्षा देतो. तरुण मुलाला कर्करोग होतो किंवा त्याचा अपघात होतो. तुम्ही जर याची पार्श्वभूमी बघितली तर त्या व्यक्तींच्या वाईट कृत्यांमुळेच त्यांच्यावर ही वेळ ओढावते. हा दैवी न्याय आहे, असे शर्मा म्हणालेत.
कधी कधी त्या व्यक्तीची चुकही नसते. त्याच्या आई-वडिलांनी काही पाप केले असतील आणि याची शिक्षा त्या व्यक्तीला होऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे. गीता, बायबलमध्येही याचा उल्लेख आहे. आपल्याला आपल्या कर्माचेच फळ मिळते. प्रत्येकाला या जन्मातच त्याच्या कर्माची फळे भोगायची आहेत, यापासून कोणाचीही सुटका नाही, असे त्यांनी नमूद केले.

हेमंत विश्व शर्मा यांच्या विधानावरुन वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘आरोग्यमंत्र्यांनी कर्करोगाबाबत केलेले विधान निंदनीय आहे. त्यांनी कर्करोग रुग्णांच्या भावना दुखावल्या, त्यांनी या विधानासाठी जाहीर माफी मागितली पाहिजे, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. तर ‘एयूडीएफ’ या पक्षाचे नेते अमिनूल इस्लाम म्हणाले, आरोग्यमंत्री राज्यात कर्करोगावर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरले, म्हणून आता ते असे विधान करत आहे. कर्करोग रुग्णांसाठी काम करणाऱ्या समाजसेवी संस्थांनीही या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे.