सर्वोच्च न्यायालयाने २०१२ मध्ये केरळच्या मच्छिमारांच्या हत्येप्रकरणी इटालीच्या दोन खलाशांविरूद्ध सुरू असलेला खटला अखेर १० कोटींच्या नुकसान भरपाईनंतर संपुष्टात आणला. इटालीच्या दोन खलाशांनी भारतीय समुद्री हद्दीत प्रवेश करत, केरळच्या दोन मच्छिमारांची हत्या केली होती. त्यांनंतर या दोघांना अटक करण्यात आली होती व त्यांच्याविरोधात खटला देखील सुरू होता. अखेर आज ९ वर्षानंतर दोघांविरोधात दाखल केले गेलेले सर्व खटले सर्वोच्च न्यायालयाने बंद करण्याचे निर्देश दिले. सॅल्व्हाटोर गिरोन आणि मॅस्सिमिलिआनो लॅटोर अशी या इटालीयन खलाशांची नावं आहेत. या अगोदर केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून दोन्ही इटालयिन खलांशाविरोधातील खटला बंद करण्याची सर्वोच्च न्यायालयास विनंती केली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयात इंदिरा बॅनर्जी व एम आर शाह यांच्या खंडपीठाने या इटालीयन खलाशांविरोधात भारतात सुरू असलेली सर्व कार्यवाही बंद करण्यास परवानगी दिली. सर्वोच्च न्यायालयाने केरळ उच्च न्यायालयास पीडित पक्षकरांना ४-४ कोटी रुपये देण्यास आणि नौकेच्या मालकास दोन कोटी रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. या अगोदर केंद्र सरकारने केरळच्या दोन मच्छिमारांच्या कुटुंबीयांना भरपाई म्हणून इटली सरकारकडून भरण्यात आलेले १० कोटी रुपये सर्वोच्च न्यायालयात जमा केले होते.