भाजपाच्या खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूनंतर मनेका गांधी यांनी केरळमधील मल्लापुरम जिल्ह्याविषयी अपमानस्पद आणि तिरस्कार निर्माण करणार विधान केलं होतं. त्या विधानावरून केरळमधील मल्लापुरम जिल्ह्यातील एका वकिलानं गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार मल्लापुरम येथील वकील सुभाष चंद्रन यांनी पोलीस अधीक्षकांकडे गुरूवारी तक्रार दाखल केली. त्यात माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी व इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली होती. “मल्लापुरम जिल्ह्याच्या विरोधात द्वेषातून बदनामी करण्याची मोहीम चालवली जात आहे. जिल्ह्याविरोधात आणि जिल्ह्यातील रहिवाशांविरोधात मनेका गांधी यांनी खोटे आणि शुल्लक आरोप केले आहेत,” असं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे. या तक्रारीवरून मनेका गांधी आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय म्हणाल्या होत्या मनेका गांधी?

गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूनंतर मनेका गांधी म्हणाल्या होत्या की,” ही हत्या आहे. मल्लापुरम अशा घटनांसाठी प्रसिद्ध आहे. हे देशातील सर्वात हिंसक राज्य आहे. येथे लोक रस्त्यावर विष फेकतात. ज्यामुळे एकाच वेळी ३०० ते ४०० पक्षी व कुत्री मारली जावी. केरळमध्ये दर तिसऱ्या दिवशी एका हत्तीला मारलं जातं. केरळ सरकारनं मल्लपुरम प्रकरणात अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली दिसत नाही. असे वाटते की ते घाबरले आहेत,” असं विधान मनेका गांधी यांनी केलं होतं.

राहुल गांधींवरही केली होती टीका

हत्तीणीच्या मृत्यूवरून मनेका गांधी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली होती. “वन विभागाच्या सचिवांची पदावरून हकालपट्टी करण्यात यावी. त्याचबरोबर वन्यजीव संरक्षण खात्याच्या मंत्र्यांना थोडीजरी समज असेल तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा”, असे मेनका गांधी म्हणाल्या होत्या. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्या म्हणाल्या, ‘कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी त्याच भागातील आहेत. त्यांनी अद्याप कारवाई का केली नाही?’ असा प्रश्नही मनेका गांधी यांनी विचारला होता.