हैदराबाद एन्काऊंटरने संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. याचे पडसाद संसदेतही उमटले असून यावर अनेक खासदारांनी लोकसभेत चर्चेदरम्यान आपली मतं मांडली आहेत. यामध्ये, शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी देखील आपले मत मांडले आहे. “हैदराबाद सारख्या घटनांची थेट सुप्रीम कोर्टातच सुनावणी व्हावी” अशी मागणी त्यांनी केली आहे.

लोकसभेत बोलताना खासदार सावंत म्हणाले, “महिलांविरोधातील गंभीर गुन्ह्यांचे खटले हे थेट सुप्रीम कोर्टात चालवले जावेत यासाठी कायदा होणे गरजेचे आहे. सध्याची कायदेशीर प्रक्रिया ही खूपच संथ असून कनिष्ठ न्यायालयापासून सुरु होऊन ती पुढे सुरुच राहते. त्यामुळे पीडित महिलेला न्याय मिळण्यास उशीर होतो. म्हणून माझे लोकसभा अध्यक्षांना आवाहन आहे की त्यांनी असे गुन्हे थेट सुप्रीम कोर्टात चालवण्याबाबत चर्चेसाठी एक समिती नेमावी.”