देशातील अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून एटीएममध्ये पैसे नसल्याने पुन्हा एकदा नोटबंदीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः बिहार, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील शहरांतल्या एटीएममध्ये अचानक रोख रकमेचा तुटवडा जाणवत आहे. एटीएमच्या बाहेर NO CASH असे फलक लावण्यात आले आहेत. रोख रकमेसाठी नागरीक वारंवार एटीमच्या चकरा मारत आहेत. पण पैसे मिळत नसल्याने, नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागतंय.

मात्र, अचानक एटीएममध्ये पैसे का नाहीत याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येईल अशी आशा रिझर्व्ह बँकेने व्यक्त केली आहे. एक-दोन दिवसात परिस्थिती सामान्य होईल, असं आरबीआयने म्हटलं आहे.

आसाम, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये लोकांनी गरजेपेक्षा जास्त रोकड काढल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं रिझर्व्ह बँकेच्या सूत्रांनी सांगितलंय. अनेक राज्यांमध्ये सणासुदीचा काळ होता त्यामुळे येथे जास्त रोकड वागरिकांनी काढली त्यामुळे हा तुटवडा जाणवत असल्याचं सांगितलं जात आहे.

नागरीक आता बॅंकेत कमी प्रमाणात कॅश जमा करतात,त्यामुळे बॅंकेतच पैसे कमी आहेत. परिणामी एटीएममध्ये गरजेनुसार पैसे टाकले जात नाहीत. बॅंकेतून जेवढे पैसे बाहेर जातात तेवढे परत येत नाहीत. कारण, बॅंकेत कॅश जमा करण्याचं प्रमाण कमी झालं आहे. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्यांची माहिती सुत्रांनी दिली आहे.