सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी सीबीआयनं नवं मेडिकल बोर्ड स्थापन करावं, अशी मागणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हीचे वकील सतिश मानेशिंदे यांनी केली आहे. त्याचबरोबर बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाच्या पूर्वनिश्चित निकालासाठी चौकशी एजन्सीवर दबाव असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

“याप्रकरणी केवळ फोटोंवरुन डॉ. सुधीर गुप्ता यांच्या अध्यक्षतेखालील फॉरेन्सिक टीमवर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या (एम्स) डॉक्टरांनी २०० टक्के निष्कर्ष काढणे हा एक धोकादायक प्रकार आहे. त्यामुळे तपास हा निष्पक्ष आणि कुठल्याही हस्तक्षेपाशिवाय होण्यासाठी सीबीआयने नवं मेडिकल बोर्ड स्थापन करायलाच हवं. आगामी बिहारच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या तपास एजन्सीजना पूर्वनिश्चित निकालासाठी दबाव टाकला जात आहे,” अस मानशिंदे यावेळी म्हणाले. सुशांतच्या कुटुंबियांचे वकील विकास सिंह यांच्या ट्विटला उत्तर देताना मानेशिंदे यांनी ही टिपण्णी केली आहे.

आणखी वाचा- सीबीआय तपासावर सुशांतचं कुटुंब नाराज; वकील विकास सिंह यांचा दावा

गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुशांतच्या कुटुंबियांचे वकील विकास सिंह म्हणाले होते की, “सुशांतच्या कुटुंबीयांना वाटतं की, या प्रकरणाचा तपास वेगळा दिशेनं व्हायला हवा. यात सगळं लक्ष ड्रग्ज प्रकरणावर केंद्रित केलं गेलं आहे. एम्सच्या डॉक्टरांनी मला सांगितलं की, सुशांतचा मृत्यू गळा दाबल्यानं झाला आहे. या प्रकरणाचा तपास योग्य दिशेनं सुरू नाही. या तपासावर मी नाखुश आहे. हे प्रकरण कोणत्या दिशेनं जात आहे माहिती नाही, आम्ही हताश आहोत. या प्रकरणात आतापर्यंत काय आढळून आलं, यासंदर्भात सीबीआयनं एकदाही माहिती दिलेली नाही.”