पाच राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाकडून (सीबीएसई) दहावी आणि बारावीची परीक्षा आठवडाभराच्या कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. या निर्णयानुसार आता येत्या ९ मार्चपासून सीबीएसईची दहावी आणि बारावीची परीक्षा सुरू होणार आहे. सीबीएसईने सोमवारी यासंदर्भातील माहिती दिली. सावधतेची सूचना म्हणून या परीक्षा आठवडाभरासाठी पुढे ढकलण्यात येत असल्याची सूचना आम्ही देत आहोत. जेणेकरून विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी आणखी कालावधी मिळेल, असे सीबीएसईतर्फे सांगण्यात आले. ९ मार्चला सुरू होणारी दहावीची परीक्षा १० एप्रिल तर बारावीची परीक्षा २९ एप्रिलला संपेल. याशिवाय, सीबीएसई बोर्डाकडून सर्व महत्त्वाच्या पेपरांमध्ये योग्य अंतर ठेवण्यात आले आहे. तसेच नीट आणि जेईई परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजीही बोर्डाकडून घेण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे सीबीएसईच्या परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात घेतल्या जातात. यंदा एकूण १६ लाख ६७ हजार ५७३ विद्यार्थी दहावीची तर १० लाख ९८ हजार ४२० विद्यार्थी बारावीची परीक्षा देतील. परीक्षा उशिराने सुरू होत असल्या तरी निकाल मात्र दरवर्षीप्रमाणेच लागतील. त्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे बोर्डाचे अध्यक्ष आर.के. चतुर्वेदी यांनी सांगितले. पुढील महिन्यापासून उत्तर प्रदेश, पंजाब, गोव्यासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. पंजाब व गोवा राज्यात एकाच टप्प्यात म्हणजे ४ फेब्रुवारी रोजी, उत्तराखंड राज्यातही एकाच टप्प्यात १५ फेब्रुवारीस मतदान होईल. मणिपूरमध्ये दोन टप्प्यात मतदान होईल. पहिल्या टप्प्यात ४ मार्च तर दुसऱ्या टप्प्यात ८ मार्च रोजी मतदान होईल. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशच्या निवडणुका सात टप्प्यात होतील. विशेष म्हणजे या सर्व राज्यांची मतमोजणी ११ मार्च रोजी होतील. मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. या निवडणुकीत १६ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.