देशात लसीकरणाला सुरुवात झालेली असताना, मोदी सरकारकडून लस डिप्लोमसीही जोरात सुरु आहे. नेपाळ, भूतान, म्यानमार, बांगलादेश, सेशेल्स, मॉरिशेस या शेजारी देशांना भारताने लसींचा साठा पाठवला आहे. आता पाकिस्तानलाही लसीचा पुरवठा करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. सध्याच्या घडीला लस जीवरक्षक असल्याने सगळयाच देशांना करोना प्रतिबंधक लस हवी आहे.

भारत माणुसकीच्या दृष्टीने शेजारी देशांना मदत करत असला, तरी चीन-पाकिस्तान बरोबर भारताचे संबंध सामान्य नाहीत. दहशतवादाला प्रोत्साहन देणं, भारतावर हल्ले घडवणं या पाकिस्तानच्या प्रवृत्तीमुळे दोन्ही देशांच्या संबंधात नेहमीच तणाव असतो. पाकिस्तानने निर्माण केलेला दहशतवादाचा राक्षस आज त्यांच्यावरच उलटला आहे. पण अजूनही पाकिस्तान सुधरलेला नाही.

आता भारत पाकिस्तानला लस पुरवठयाचा विचार करणारा का? असा मुद्दा उपस्थित केला जातोय. त्यावर पाकिस्तानकडून लस पुरवठयासाठी अजून कोणतीही विनंती आलेली नाही, असे भारताकडून शुक्रवारी सांगण्यात आले. भारताने आतापर्यंत बांगलादेश, नेपाळ, म्यानमार, भूतान आणि मालदीव या देशांना ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा साठा पाठवून दिलाय. काही मंजुऱ्या मिळाल्यानंतर अफगाणिस्तान, श्रीलंका या देशांनाही ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा पुरवठा सुरु होईल. “भारतीय बनावटीची लस पाठवण्यासाठी पाकिस्तानने कोणतीही विनंती केल्याचे मला माहित नाही” असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितलं.