महागड्या औषधांच्या किंमतीतून गरीबांना दिलासा देत औषधांच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात आली आहेत. याबाबत राज्यमंत्री मनसुखलाल मंडाविया यांनी राज्यसभेत माहिती दिली. 1 हजार 32 महागड्या औषधांच्या किंमती नियंत्रणात आणण्यात आल्याचेही त्यांनी सभागृहाला सांगितले.

सामान्यत: वापरण्यात येणाऱ्या 1,032 आवश्यक औषधांच्या किंमती नियंत्रित करण्यात आल्या आहेत. या औषधांच्या किंमतीत 90 टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. या औषधांच्या किंमतीत कपात करण्यात आल्यामुळेच जन औषधी केंद्रांवर मिळणाऱ्या 526 निरनिराळ्या औषधांची किंमत 90 टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचे मंडाविया यांनी सांगितले. 80 टक्क्यांपेक्षा अधिक महागड्या औषधांना या यादीतून बाहेर ठेवल्याबाबत एक प्रश्न विचारण्यात आला. आवश्यक औषधांची यादी आरोग्य मंत्रालयाने तयार करत असते. यामध्ये सर्वाधिक वापर होणाऱ्या औषधांचा समावेश असतो. या औषधांचे वितरण देशभरात सुरू केलेल्या 5 हजार 358 जन औषधी केंद्रांमधून करण्यात येत आहे. औषधांच्या गुणवत्तेत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जात नसल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रत्येक जन औषधी केंद्रांमधून 700 पेक्षा अधिक औषधांचे वितरण होत असल्याची माहिती एका प्रश्नाला उत्तर देताना दिली. दरम्यान, दररोज सरासरी 20 ट्रक औषधांची वितरण केले जात असून आवश्यक त्या प्रमाणात औषधे उपलब्ध असल्याचेही मंडाविया यांनी सांगितले. या व्यवस्थेवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेमार्फत केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.