देशात करोना करोना महमारीमुळे आतापर्यंत लाखो जणांना जीव गमावावा लागला आहे. यामुळे कित्येक कुटुंबांनी आधार गमवाला आहे. यामध्ये सामान्य नागरिकच नाही तर अगदी व्हीआयपी व्यक्तींपासून ते करोना योद्धे, शासकीय कर्मचारी, सेलिब्रिटी व पत्रकारांचा देखील समावेश आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्र सरकारकडून करोनामुळे मृत्यू झालेल्या ६७ पत्रकारांच्या कुटुंबासाठी ५ लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिलं आहे. त्यानुसार भारत सरकारने करोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या ६७ कुटुंबाना आर्थिक मदतीसाठी मंजुरी दिली आहे. गुरूवारी माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या पत्रकार कल्याण योजनेअंतर्गत प्रत्येक परिवारास ५ लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे.

अनेक दिवसांपासून करोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबासाठी आर्थिक मदत दिली जावी, अशी मागणी केली जात होती. झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांनी देखील अशा कुटुंबासाठी सहायता निधीची मागणी केलेली आहे.
केंद्र सरकारने देखील हा मुद्दा गांभीर्याने घेत गुरूवारी एका बैठकीत आर्थिक मदतीसाठी मंजुरी दिली. केंद्र सरकार ६७ पत्रकारांच्या प्रत्येक कुटुंबास ५ लाख रुपये आर्थिक मदत देणार आहे.