गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर चर्चेच्या फेऱ्या सुरू असतानाच चीननं पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात नियंत्रण रेषेवर कुरापती केल्या. चिनी सैन्यानं घुसखोरी करून नियंत्रण रेषेवरील परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. चिनी सैन्याचा हा प्रयत्न भारतीय लष्करानं हाणून पाडला. त्यानंतर या परिसरात तणाव निर्माण झाला असून, यावर तोडगा काढण्यासाठी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक सुरू झाली आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सध्या दिल्लीत उच्चस्तरीय बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, सीडीएस प्रमुख बिपीन रावत, लष्करप्रमुख एम.एम. नरवणे आणि लष्कराच्या विशेष मोहिमांचे संचालक उपस्थित आहेत. या बैठकीत तणाव निवळण्यासाठी मार्ग काढण्यावर चर्चा केली जाणार आहे. त्याचबरोबर सीमेवर नव्यानं निर्माण झालेल्या वादावर चर्चेतून तोडगासंदर्भात चर्चा केली जात आहे, असं वृत्त इंडिया टुडेनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.

आणखी वाचा- भारत चीन सीमेवर तणाव; दोन्ही बाजूचे रणगाडे एकमेकांच्या फायरिंग रेंजमध्ये

दोन्ही देशात लष्कर पातळीवर चर्चा सुरु असाताना दोन्ही देशाचे रणगाडे एकमेकांच्या फायरिंग डिस्टन्समध्ये (शत्रूवर तोफगोळ्यांचा मारा करता येईल एवढ्या अंतरावर) आले आहेत. चीनचे रणगाडे आणि शस्त्रसज्ज वाहनं कालाटोप डोंगराच्या पायथ्याथी तैनात करण्यात आली आहेत. हा भाग भारतीय लष्कराच्या ताब्यात आहे.

आणखी वाचा- अतिक्रमणाची चाल करण्याआधी चीनने लडाखजवळ तैनात केली J-20 फायटर विमाने

चीनकडून जड आणि तसंच हलक्या वजनाचे रणगाडे तैनात करण्यात आले असून भारतापासून जवळच्या अंतरावर आहेत. दुसरीकडे कालाटोप येथे तैनात असणारे भारतीय जवानही रणगाडे आणि तोफांसोबत पूर्णपणे सुसज्ज आहेत. कालाटोप भारतीय स्पेशल फ्रंटियर फोर्सच्या ताब्यात असून इतर ठिकाणीही लष्करी तुकड्या तैनात असल्याने चिनी रणगाडे आणि वाहनांची हालचाल सध्या थांबली आहे.