जम्मू काश्मीरमधून निमलष्करी दलाच्या १० हजार जवानांना माघारी बोलावण्याचा आदेश केंद्र सरकारने दिला आहे. केंद्रशासित प्रदेशात तैनात करण्यात आलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचा आढावा घेतल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या एकूण १०० तुकड्यांना जम्मू काश्मीरमधून तात्काळ माघारी येण्याचा आदेश देण्यात आला आहे. या तुकड्यांना आपल्या तळावर परतण्यास सांगण्यात आलं आहे. जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं ३७० कलम हटवण्यात आल्यानंतर या जवानांना तैनात कऱण्यात आलं होतं. Centre orders 'immediate' withdrawal of about 10,000 paramilitary forces personnel from Jammu and Kashmir: Officials — Press Trust of India (@PTI_News) August 19, 2020 आदेशानुसार, केद्री राखीव पोलीस दलाच्या ४० तर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, सीमा सुरक्षा दल आणि सशस्त्र सीम बळाच्या प्रत्येकी २० तुकड्या या आठवड्याअखेर जम्मू काश्मीरमधून हटवल्या जातील. केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या एका तुकडीत १०० जवान असतात. याआधी केंद्रीय गृहमंत्रालयाने याआधी मे महिन्यात केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या १० तुकड्या माघारी बोलवल्या होत्या. नव्याने तुकड्या माघारी बोलावल्यानंतर आता काश्मीर खोऱ्यात सीआरपीएफच्या ६० तुकड्या तैनात असतील. प्रत्येक तुकडीत १००० जवान असतील.