गृह मंत्रालयाने शनिवारी जम्मू काश्मीर येथून निमलष्करी दलाच्या दहा तुकड्या हटवण्याचा आदेश दिला आहे. तसेच नऊ तुकड्या महाराष्ट्रात पाठवण्याचा आदेशही देण्यात आला आहे. जम्मू काश्मिरमधून हटवण्यात आलेल्या दहा तुकड्यांमध्ये एक हजार निमलष्करी जवान तैनात आहेत. प्रत्येक तुकडीमध्ये १०० जवानांचा समावेश आहे. या दहा तुकड्यात जम्मू विभागातील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) आणि भारत-तिबेट सीमा पोलिसांच्या (आयटीबीपी) प्रत्येकी तीन तुकड्या, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) आणि सशस्त्र सीमा बलाच्या (एसएसबी) प्रत्येकी दोन तुकड्याांचा समावेश आहे.

करोनाचा प्रसार रोखण्याबरोबरच करोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार वेगवेगळ्या पातळ्यांवर लढत आहे. लॉकडाउनच्या माध्यमातून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहे. त्याचा अनुकूल परिणाम गेल्या महिनाभराच्या आकडेवारीतून दिसून आला होता. करोनाच्या प्रसारावर परिणाम झाल्याचं निरीक्षण अभ्यासातून दिसून आलं होतं. मात्र, मागील चार दिवसांच्या आकडेवारीनं नवं आव्हानं सरकारसमोर उभं राहिलं आहे.

जम्मू काश्मिरमधून हटवण्यात आलेल्या दहा तुकड्यांपैकी पाच तुकड्या महाराष्ट्रात पाठवण्यात येणार आहेत. यामध्ये दोन तुकड्या सीआरपीएफच्या तर तीन तुकड्या सीआयएसएफच्या असतील. तसेच मुंबईतील शीघ्र कृती दलाच्या (आरएएफ) 4 तुकड्या महाराष्ट्रासाठी वापरल्या जाणार आहेत. आरएएफ हे सीआरपीएफचे विशेष दंगलविरोधी पथक आहे.

पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी निमलष्करी दलांच्या तुकड्या पाठवाव्यात, अशी मागणी नुकतीच महाराष्ट्र सरकारकडून केंद्राला करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर राज्यात नऊ तुकड्या पाठवण्यात आल्या आहेत. राज्यात आधीपासूनच सीआरपीएफच्या ३२ तुकड्या तैनात आहेत. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी त्या तुकड्या महाराष्ट्र पोलिसांच्या बरोबरीने बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळत आहेत.