प्रक्षोभक विधाने करण्यात पटाईत असलेले एमआयएमचे नेते अकबरुद्दिन ओवेसी यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केले असून, काँग्रेससोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी टीका केली. ३० जानेवारीला केलेल्या त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या वेगाने प्रसारित होतो आहे. आपण काँग्रेस पक्षाला देशातून नेस्तनाबूत करू, असे विधान अकबरुद्दिन ओवेसी यांनी केले आहे. त्याचबरोबर त्यांनी मोदींच्या सबका साथ, सबका विकास या घोषणेवरही टीका केली. मोदी सत्तेत आल्यापासून कोणाचाच विकास झालेला नसून, केवळ एका चहावाल्याचा विकास झाला असल्याचे ओवेसी यांनी म्हटले आहे.
हैदराबादमधील बाबा नगर भागात एका जाहीर सभेत बोलताना अकबरुद्दिन ओवेसी यांनी काँग्रेस आणि मोदींवर टीका केली. आम्ही संपूर्ण देशातून काँग्रेसचा सुपडा साफ करू, त्यासाठी आम्हाला जास्त वेळ लागणार नाही, असे त्यांनी सांगितले. मोदींवर टीका करताना त्यांनी सबका साथ, सबका विकास असे निवडणुकीपूर्वी मोदी म्हणत होते. पण ते सत्तेवर आल्यानंतर कुणाचाच विकास झाला नाही. फक्त एका चहावाल्याला चांगले दिवस आले, असे सांगत त्यांनी मोदींवर निशाणा साधला.