भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हयात असते तर सध्या राज्यात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेत सुरू असलेली रस्सीखेच झाली नसती. मुंडे यांचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी अत्यंत सकारात्मक संवाद होता. त्यामुळे मुंडे असते तर वाद झाले नसते, अशी भावना शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केली. गोपीनाथ मुंडे यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुंडे ‘संघर्षशील नेते’ नेते होते. त्यांचे जीवन म्हणजे प्रतिकूल लढा होता. जनसामान्यांसाठी झटण्याचा त्यांचा वारसा पुढे नेऊ, अशी भावना जावडेकर यांनी व्यक्त केली.  पासवान म्हणाले की, अनेक राजकीय नेते आहेत, पण नियत व नीती साफ असलेला नेता म्हणजे गोपीनाथ मुंडे होते. त्यांचे नेतृत्व पक्षाच्या पलीकडचे होते. फुलाचा सुगंध कधीही बंदिस्त राहू शकत नाही. तो दरवळतो. त्याचप्रमाणे गोरगरिबांचा नेता म्हणून देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात पहिले मुंडे यांचेच नाव घेतले जाते.