भाडेरचनेच्या तुलनेत आठशे रुपयांपर्यंत स्वस्त; दोन तासांचा वेळही वाचणार  

देशाच्या राजधानीला आर्थिक राजधानीशी जोडणारी विशेष राजधानी एक्स्प्रेस येत्या सोमवारपासून (दि. १६ ऑक्टोबर) चालू होत आहे. आठवडय़ातून तीन दिवस धावणाऱ्या या विशेष राजधानीचे भाडे सध्याच्या लवचीक भाडेरचनेच्या (फ्लेक्झी फेअर) तुलनेत पाचशे ते आठशे रुपयांनी स्वस्त असल्याचा रेल्वेचा दावा आहे. विशेष म्हणजे या गाडीने प्रवास केल्यास दोन तासही वाचतील.

रेल्वेसाठी सर्वाधिक व्यस्त असलेल्या मुंबई-दिल्ली या मार्गावर सध्या दोन राजधानी गाडय़ांसह सुमारे तीस एक्स्प्रेस गाडय़ा धावतात. पण तरीही मोठी मागणी असतेच, हे लक्षात घेऊन रेल्वेने तिसरी विशेष राजधानी गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. आता त्याला सोमवारी हिरवा झेंडा दाखविला जाईल. थांब्यांची संख्या तीन स्थानकांएवढीच (कोटा, बडोदा, सुरत) ठेवल्याने आणि ५४०० अश्वशक्तीचे दोन ‘लोकोमोटिव्ह’चा वापर केल्याने या गाडीला फक्त १३ तास ५५ मिनिटांचा वेळ लागेल. सध्या १५ तास ५० मिनिटांचा वेळ राजधानीला लागतो.

सध्या राजधानी गाडय़ांचे तिकीट हे मागणीवर आधारित असलेल्या लवचीक भाडेरचनेनुसार (फ्लेक्झी फेअर) आकारले जाते. रेल्वेच्या दाव्यानुसार, नव्या गाडीच्या तृतीय वातानुकूलित श्रेणीचे (थर्ड एसी) भाडे सुमारे पाचशे ते सहाशे रुपयांनी कमी होईल, तर द्वितीय वातानुकूलित (सेकंड एसी) श्रेणीचे तिकीट ७०० ते ८०० रुपयांनी कमी होईल. मात्र हे भाडे सध्याच्या राजधानीच्या मूळ भाडय़ाच्या तुलनेत वीस टक्क्यांनी जास्त असेल.

नवी गाडी अशी असेल..

* ही विशेष राजधानी एक्स्प्रेस दिल्लीतील हजरत निजामुद्दीन स्थानकावरून बुधवार, शुक्रवार आणि रविवारी, तर वांद्रे टर्मिनसवरून मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी सुटेल.
* प्रवासाचा वेळ १३ तास ५५ मिनिटे असेल. सध्याच्या राजधानीच्या तुलनेत (१५ तास ५० मिनिटे) सुमारे दोन तास कमी लागतील.’ही गाडी कोटा, बडोदा आणि सुरत या तीनच स्थानकांवर थांबेल. नाष्टा, भोजन सुविधा ऐच्छिक असेल.