देशातील पैशाच्या वापराचा अथवा व्यवहारांचा अभ्यास करणे, हा लोकांसाठी अर्थशास्त्र शिकण्याचा उत्तम मार्ग असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सांगितले. तामिळनाडूकडे बघता या राज्याची अर्थव्यवस्था चांगल्या प्रकारे आकाराला येत आहे, हे मी विश्वासाने सांगू शकतो, या शब्दांत पी. चिदंबरम यांनी तामिळनाडूच्या आर्थिक प्रगतीचे कौतुक केले. कॉर्पोरेशन बँकेच्या तामिळनाडूमधील शालीग्राम आणि श्रीरंगपट्टणम येथील शाखांच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. कर्ज घेणे हा काही गुन्हा नाही, आपल्या भविष्यकाळाविषयी विश्वास असणारे लोकच कर्ज घेतात, असे सांगत त्यांनी लोकांच्या कर्ज घेण्याच्या वृत्तीचे समर्थन केले. यूपीए सरकारने आपल्या कार्यकाळात अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अनेक पावले उचलल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी आणि विद्यार्थ्यांना कर्ज मिळणे ही काही सोपी गोष्ट नाही. आतापर्यंत २५ लाख विद्यार्थ्यांना ५४,००० कोटी रूपयांची कर्जे वितरित करण्यात आल्याचे चिदंबरम यांनी यावेळी नमूद केले.