बुलेट ट्रेनऐवजी परिवहन सेवा सुधारण्याचा चिदम्बरम यांचा मोदींना सल्ला

नोटाबंदीसाठीच्या निर्णयाची अंमलबजावणी करावयास लावली असती तर आपण अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला असता असे म्हणत माजी अर्थमंत्री पी चिदम्बरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केली.

यावेळी त्यांनी घाईघाईने अंमलबजावणी केलेल्या जीएसटी (वस्तू आणि सेवा कर विधेयक) आणि त्यांचा महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पावरून मोदींना लक्ष्य केले.

जर माझ्या पंतप्रधानांनी नोटाबंदी करावी का याबाबत विचारले असते तर मी त्यांना ‘कृपया असे करू नका’ असा सल्ला दिला असता. आणि जर त्याबाबतचा आग्रह केला असता तर मी माझ्या पदाचा राजीनामा दिला असता, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

नोटाबंदी आणि जीएसटीची घिसाडघाईने केलेली अंमलबजावणी यामुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली असून, मोदी सरकारच्या या दोन प्रमुख चुका आहेत. नोटाबंदी ही अतिशय वाइट कल्पना होती तर जीएसटी ही चांगली कल्पना होती, मात्र जीएसटी अतिशय गडबडीत अमलात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. जीएसटीची अंमलबजावणी करताना आवश्यक ती काळजी आणि लक्ष देणे आवश्यक होते, असे चिदम्बरम यांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांचा महत्त्वाकांक्षी अहमदाबाद आणि मुंबई बुलेट ट्रेनच्या प्रकल्पास प्राधान्य असूच शकत नाही. बुलेट ट्रेन करण्यापूर्वी सुरक्षा, स्वच्छता, उत्तम स्टेशन, चांगली सिग्नल यंत्रणा आणि उपनगरीय परिवहन सेवा यामध्ये सुधारणा करण्यासाठी लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आरोग्य आणि शिक्षणावर निधी खर्च करा

ज्यावेळी बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण होईल, त्यावेळी फक्त ६०० लोक (एका फेरीत) बुलेट ट्रेनमधून प्रवास करणार आहे. त्यासाठी सरकारने जपानकडून प्रचंड प्रमाणात कर्ज घेतले आहे. त्याऐवजी सरकारने हा पैसा आरोग्य आणि शिक्षण, जे लोकांना हवे आहे त्यावर खर्च करणे आवश्यक होते. बुलेट ट्रेनची गरज ही पुढील १० ते १५ वर्षांनंतर आहे. त्यास सध्यस्थितीत प्राधान्य देण्याची आवश्यकता नसल्याचे चिदम्बरम यांनी सरकारवर टीका करताना म्हटले आहे.