महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी झालेली ही पहिलीच भेट आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत त्यांचे पुत्र आणि महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेही होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सगळेच मुख्यमंत्री पंतप्रधानांची भेट घेत असतात. हा एक शिष्टाचार समजला जातो. या भेटीत मुख्यमंत्री हे आपल्या राज्याचे प्रश्नही त्यांच्यापुढे मांडत असतात. 25 वर्षांपासून शिवसेना हा भाजपाचा मित्रपक्ष होता. मात्र महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपासोबत काडीमोड घेतला आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन सरकार स्थापन केलं. त्यानंतर ही भेट महत्त्वाची मानली जात होती. Delhi: Chief Minister of Maharashtra, Uddhav Thackeray as well as Minister in Maharashtra Government, Aaditya Thackeray called on PM Narendra Modi, today. pic.twitter.com/tkbBewcEpO — ANI (@ANI) February 21, 2020 दरम्यान ठाकरे सरकारला तीन महिने पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत गेले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका पत्रकार परिषदेतही आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहोत असं सांगितलं होतं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात सुरु असलेली बैठक काही वेळापूर्वीच संपली आहे. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हे तीन पक्ष एकत्र आले. त्यानंतर झालेल्या एका पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी मी लवकरच दिल्लीत जाऊन माझ्या मोठ्या भावाला भेटणार आहे असं वक्तव्य केलं होतं. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे यांचा उल्लेख 'लहान भाऊ' असा केला होता. त्यानंतर आज दिल्ली येथे येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.