चिकनगुनियामुळे दिल्लीमध्ये मंगळवारी चार जणांचा मृत्यू झाला आहे. अशा वेळी या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करण्याऐवजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मात्र याचेही राजकारण करताना दिसत आहेत. राज्यातील आरोग्य स्थिती बिघडली आहे. परंतु अशा बिकट परिस्थितीतही आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन हे दिल्लीत नाहीत. याबाबत मुख्यमंत्री केजरीवाल यांना पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी हा प्रश्न नायब राज्यपाल यांना विचारण्याचा सल्ला दिला. एका व्यक्तीने ट्विट केले की, दिल्लीला डासांपासून वाचवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. परंतु अशा परिस्थिती आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन दिल्लीच्या बाहेर असल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यावर अरविंद केजरीवाल यांनी उत्तर दिले, दिल्लीत मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांकडे कोणतेही अधिकार नाहीत. मी माझ्या मर्जीने एक पेनही खरेदी करू शकत नाही. नायब राज्यपाल आणि पंतप्रधान हेच सर्व अधिकारांची मजा घेत आहेत. नायब राज्यपालही दिल्लीच्या बाहेर आहेत. दिल्लीबाबत त्यांना प्रन विचारा. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार सत्येंद्र जैन हे सध्या गोव्यात गेले आहेत. पुढील वर्षीतिथे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी ते तेथे गेले आहेत. केजरीवाल ही आपल्या घशावर शस्त्रक्रिया करण्यासाठी बंगळुरूला गेले आहेत. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हेही दिल्ली बाहेर आहेत. ते फिनलँडला गेले आहेत. नायब राज्यपाल नजीब जंग हे कामानिमित्त अमेरिकेला गेले आहेत. दिल्लीत असेलेले एक मंत्री कपिल मिश्रा यांनी आम आदमी पक्षाचा बचाव करताना भाजपला जबाबदार ठरवले आहे. महानगरपालिकेवर भाजपची सत्ता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दिल्लीत आतापर्यंत चिकनगुनियाने चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर डेंग्यू आणि मलेरियानेही आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एक हजार चिकनगुनियाचे रूग्ण असल्याचे समोर आले आहे. डेंग्यूचे ११०० रूग्ण व मलेरियाचे २३ रूग्ण आढळून आले आहेत.