‘क्राय’ या सामाजिक संस्थेने देशातील १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांबाबत प्रसिद्ध केलेल्या एका अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार भारतातील १५ ते १८ वर्षे वयोगटातील सुमारे २.३ कोटी मुले बालकामगार आहेत आणि त्यापैकी १९ दशलक्ष मुलांनी शिक्षणही सोडून दिले आहे. क्रायच्या अहवालानुसार १५ ते १९ वर्षे वयोगटातील ९.२ दशलक्ष मुलांचे विवाह झाले आहे तर याच वयोगटातील २.५ दशलक्ष मुली माता झाल्या आहेत. देशातील २३ दशलक्ष बालकामगारांपैकी १९ दशलक्ष मुलांवर शिक्षण आणि नोकरी यांचा ताळमेळ न साधता आल्याने शिक्षण सोडण्याची वेळ आली आहे. शिक्षण सोडण्याचे प्रमाण पाहता शिक्षणाच्या धोरणामध्ये बदल करण्याची गरज असून दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबातील मुलांना माध्यमिक शिक्षणही मोफत देण्याची गरज असल्याचे या अहवालात म्हटले आहे. गेल्या वर्षी देशात लहान मुलींच्या अपहरणाचे प्रमाण वाढले आणि अपहरण झालेल्या मुलींपैकी ६० टक्के मुली १५ ते १८ वर्षे वयोगटातील आहेत, तर २५ टक्के बलात्काराच्या घटनांमधील पीडित या वयोगटातील आहेत. सदर दोन्ही समस्यांना आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे, असे अहवालात म्हटले आहे.