ब्रिक्स शिखर परिषदेचे या वर्षीचे यजमानपद भारताने स्वीकारण्यास चीनने पाठिंबा दर्शविला असून पाच सदस्य असलेल्या देशांमधील सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी भारतासमवेत काम करण्याची तयारीही दर्शविली आहे. पूर्व लडाखमधून भारत आणि चीन यांनी आपले सैन्य मागे घेण्यास सुरुवात केल्यानंतर चीनने भारताला पाठिंबा दर्शविला आहे.

भारताने २०२१ च्या ब्रिक्स शिखर परिषदेचे (ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका) अध्यक्षपद स्वीकारण्याचे गृहीत धरले असून त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी १९ फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या सुषमा स्वराज भवनातील ब्रिक्स सचिवालयात भारताचे ब्रिक्स २०२१ संकेतस्थळ सुरू केले.

यावर्षीच्या ब्रिक्स परिषदेचे यजमानपद भारताने स्वीकारण्याचे ठरविले आहे त्या बाबत विचारले असता चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी, भारताने ब्रिक्सचे यजमानपद स्वीकारण्यास चीनचा पाठिंबा असल्याचे, सांगितले.

ब्रिक्स हा आता आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये सकारात्मक, स्थिर आणि रचनात्मक शक्ती आहे, असे ते म्हणाले. मात्र, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग शिखर परिषदेला उपस्थिती राहणार आहेत का, त्याबाबत वांग यांनी कोणतेही भाष्य केले नाही.