काळया पोषाखातील शस्त्रसज्ज कमांडो, आकाशात घिरटया घालणारे ड्रोन विमान आणि जीपीएस ट्रॅकरच्या माध्यमातून प्रत्येक हालचालीवर ठेवली जाणारी नजर. तुम्हाला वाटेल कुठलीतरी आंतरराष्ट्रीय परिषद किंवा एखाद्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाच्या सुरक्षेसाठी इतका बंदोबस्त ठेवला आहे. पण तुमचा समज चुकीचा आहे. चीनमध्ये बोर्डाच्या परिक्षेचे पेपर फुटू नयेत म्हणून इतका बंदोबस्त ठेवण्यात येतो.

भारतात सीबीएसईचे दहावी आणि बारावीचे पेपर फुटल्याची घटना ताजी असताना चीनमध्ये बोर्डाच्या परिक्षेचे पेपर फुटू नयेत यासाठी अत्यंत काटेकोर नियोजन आणि काळजी घेतली जाते. स्वॅटचे कमांडो, ड्रोन आणि जीपीएसच्या माध्यमातून नजर ठेवली जाते. इतके सर्व करुनही पेपर फुटलाच तर दोषीला सात वर्ष तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

या परिक्षेसाठी १ कोटी विद्यार्थी दहा वर्ष मेहनत घेत असतात. परिक्षा पास होणाऱ्या फक्त तीस लाख विद्यार्थ्यानाच कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे बरेच काही पणाला लागलेले असते. या परिक्षेतून तुमचे करीयर बनते किंवा बिघडते. भारतात बिलकुल याउलट चित्र आहे. भारतात आतापर्यंत अनेकदा विद्यार्थ्यांच्या करीयरच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या परिक्षेचे पेपर्स फुटले आहेत.
रेडिओ सिग्नल विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू नये यासाठी हेनान प्रांतात परिक्षा केंद्राच्यावर ड्रोन विमाने घिरटया घालत होती. पेपर परिक्षा केंद्रावर कसे पोहोचतायत त्यावर जीपीएस ट्रॅकरच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाते.