पूर्व लडाखमध्ये भारतीय सैनिकांसोबत झालेल्या चकमकीनंतर पहिल्यांदाच चीनने आपले सैनिक ठार झाल्याचं मान्य केलं आहे. चीनने आपले २० पेक्षा कमी सैनिक मारले गेले असल्याचं सांगितलं आहे. आयएएनएसने यासंबंधी वृत्त दिलं आहे. भारतीय जवानांनी चकमकीत ठार झालेल्या १६ जवानांचे मृतदेह चीनकडे सोपवले असल्याचं वृत्त आल्यानंतर चीनने ही कबुली दिली आहे.

लडाखमध्ये झालेल्या चकमकीत २० जवान शहीद झाल्याचं भारताने जाहीर केल्यानंतरही चीन मात्र शांत होतं. आपल्या जखमी किंवा ठार झालेल्या जवानांची कोणतीही माहिती चीनकडून देण्यात आली नव्हती. पण पहिल्यांदाच चीनकडून अधिकृतपणे जवान ठार झाल्याचं मान्य करण्यात आलं आहे.

आणखी वाचा- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रशियाला रवाना; चीनची चर्चा होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष

याआधी ग्लोबल टाइम्सने ‘चिनी तज्ञ’ या लेखात तणाव वाढू नये यासाठी चीन लडाखमधील जखमी तसंच ठार जवानांची आकडेवारी जाहीर करत नसल्याचं सांगितलं होतं. जर चीनने २० पेक्षा कमी जवानांचा आकडा जाहीर केला तर भारतीय सरकार पुन्हा दबावात येईल असं ट्विट ग्लोबल टाइम्सकडून करण्यात आलं होतं.

आणखी वाचा- चीनचा हल्ला विफल करण्यासाठी भारताने तैनात केली स्पेशल ‘माऊंटन फोर्स’

चीनमधील काही विश्लेषक आणि निरीक्षकांनी भारतीय अधिकारी भारतीयांना दिलासा देण्यासाठी चीनमधील जखमी तसंच ठार जवानांची आकडेवारी भारतापेक्षाही जास्त असल्याचं सांगत असल्याचा आरोप केला होता. ग्लोबल टाइम्सने आपल्या रिपोर्टमध्ये माजी लष्करप्रमुख आणि केंद्रीय मंत्री व्ही के सिंग यांचाही उल्लेख केला आहे. व्ही के सिंग यांनी शनिवारी चीनचे ४० हून अधिक जवान ठार झाल्याचं म्हटलं आहे.