डोक्लाम मुद्यावरून भारत-चीनच्या सैन्यामधील तणावात वाढ झाली आहे. चीनने पुन्हा एकदा भारताला डोक्लामप्रश्नी इशारा दिला आहे. याबाबत चीनने १५ पानांचे निवेदन जारी केले आहे. यामध्ये भारताने कुठल्याही अटींशिवाय डोक्लामधील आपले सैन्य हटवावे, अशी मागणी केली आहे. डोक्लाम प्रकरणी भारत विनाकारण भूतानला एका प्याद्याप्रमाणे पुढे करीत असल्याचा आरोपही चीनने केला आहे. चीनने म्हटले आहे की, डोक्लाम हा भूतान आणि चीन या दोन्ही देशांतील वाद आहे. हा वाद दोन्ही दोशांमध्ये रहायला हवा. डोक्लामप्रकरणी कुठल्याही कारवाईचा भारताला अधिकार नाही. भारत या प्रकरणी विनाकारण वाद निर्माण करीत आहे. भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे गेल्या आठवड्यात बीजिंगच्या दौर्यावर होते, यावेळी त्यांची चीनचे सुरक्षा सल्लागार यांग ची यांच्याशी चर्चा झाली होती, या पार्श्वभूमीवर चीनने हे निवेदन जारी केले आहे. दरम्यान, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून ३० जून रोजी डोक्लामप्रकरणी स्पष्टीकरण दिल्यानंतर आजवर कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी २० जुलै रोजी या प्रकरणी संसदेत चीनच्या प्रश्नावर उत्तर देताना छोटे स्पष्टीकरण दिले होते. याप्रकरणी ऐतिहासिक संदर्फ देताना चीनने १८९०मध्ये ब्रिटन आणि चीन झालेल्या कराराची माहिती दिली आहे. तसेच भारतीय सैन्याने सिक्कीममध्ये अनधिकृतरित्या चीन-भारत सीमारेषा ओलांडल्याचा आरोपही केला आहे. आपल्या निवेदनात चीनने म्हटले आहे की, भारताने भूतानमधील 'डोका ला पोस्ट'जवळ चीनकडून सुरु असलेल्या रत्याचे बांधकाम रोखण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी ४० भारतीय सैनिकांनी एका बुलडोझरच्या मदतीने चीनच्या कन्स्ट्रक्शन कंपनीचे काम थांबवले होते. याची माहिती देताना चीनने दोन छायाचित्रेही यासोबत जाडली आहेत. त्याचबरोबर भारताच्या बाजूचे सैन्य डोक्लामधून हटवण्याची मागणी केली आहे. मात्र, यावर अद्याप भारताकडून कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.