लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षनानंतर निर्माण झालेला तणाव अद्यापही निवळला नसतानाच पुन्हा एकदा चीनकडून नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला. पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात पुन्हा घुसखोरी करून परिस्थिती बदलण्याचा चिनी लष्कराचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला. भारतीय लष्कराने यासंबंधी माहिती दिली आहे. दरम्यान चीनने भारताला स्पर्धेत गुंतण्याची इच्छा असेल तर भूतकाळात झालं नाही इतकं मोठं लष्करी नुकसान करु अशी धमकी दिली आहे. सरकारी मुखपत्र ग्लोबल टाइम्सच्या माध्यमातून चीनने भारताला धमकावलं आहे.

भारताने सोमवारी चिनी सैनिकांचा घुसखोरीचा डाव उधळल्यानंतर त्याच दिवशी चिनी सैन्यांच्या प्रवक्त्याकडून भारताने बिजिंगमधून सैन्य मागे घेण्याची मागणी करत अनधिकृतपणे नियंत्रण रेषा ओलांडला असल्याचा आरोप केला. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या सैन्यांनी नियंत्रण रेषा पार केली नसल्याचाही दावा केला आहे.

चीनने ग्लोबल टाइम्सच्या संपादकीयमध्ये भारताकडूनच सर्वात प्रथम घुसखोरी प्रयत्न केला आणि संघर्षासही सुरुवात केली असा दावा केला आहे. शक्तिशाली चीनचा सामना करताना अमिरिकेतून याप्रकरणी काही पाठिंबा मिळेला या भ्रमात राहू नका असंही चीनने म्हटलं आहे.

पण जर भारताला संघर्ष करण्याची इच्छा असेल तर चीनकडे अधिक साधनं आणि क्षमता आहे. जर भारताला लष्करी सामर्थ्य दाखवायचं असेल तर पिपल्स लिबरेशन आर्मी भारतीय लष्कराला १९६२ मध्ये झालं त्यापेक्षाही जास्त नुकसान सहन करण्यास भाग पाडेल अशी धमकी चीनने दिली आहे.

याआधी जून महिन्यात लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैनिकांमध्ये संघर्ष झाला होता. यावेळी भारताचे २० जवान शहीद झाले होते तर चीनचंही मोठं नुकसान झालं होतं. यानंतर चर्चेच्या माध्यमातून दोन्ही देशांनी सैन्य माघार घेण्यास सहमती दर्शवली होती.