उत्तर प्रदेशात काँग्रेसचं सरकार आणायची जबाबदारी मी प्रियंका गांधींवर सोपवली आहे अशी घोषणा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. आज दिवसभर उत्तरप्रदेशातील लखनऊ येथे प्रियंका गांधी यांचा रोड शो आणि रॅली होती. या रॅलीमध्ये प्रियंका गांधी, राहुल गांधी, ज्योतिरादित्य सिंधिया, राज बब्बर यांच्यासह सगळ्याच दिग्गज नेत्यांची हजेरी आहे. तसेच काँग्रेस कुठेही बॅकफूटवर नाही तर फ्रंटफूटवर जाऊन खेळणार आहे असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

आपल्या भाषणामध्ये राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवरही सडकून टीका केली. आपल्या देशाचा चौकीदार चोर आहे हे वास्तव आहे. मागील पाच वर्षात मोदींनी देशासाठी काहीही केले नाही. दरवर्षी 2 कोटी रोजगार निर्माण करू असे आश्वासन देणाऱ्या मोदींनी फक्त अनिल अंबानींचा फायदा करून दिला. पाच वर्षात शेतकऱ्यांचे कर्ज माफ होण्याऐवजी मोजक्या उद्योगपतींचं कर्ज माफ गेलं. चौकीदार चोर है

नरेंद्र मोदींची नक्कल
आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी छपन्न इंची छाती फुगवून बोलत नाहीत. आता नरेंद्र मोदींची देहबोलीच बदलली आहे. त्यांनी भ्रष्टाचार केला आहे हे त्यांची देहबोलीच सांगते आहे असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कलही करून दाखवली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फक्त त्यांच्या मित्रांचा फायदा करून दिला. देशासाठी काहीही केले नाही असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.