वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन आसामच्या गुवहाटी आणि ईशान्येकडच्या अन्य राज्यांमध्ये हिंसक विरोध प्रदर्शन सुरु आहे. लोकसभेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत हे विधेयक मंजुरीसाठी मांडले आहे. त्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.

त्रिपुराच्या कांचनपूर आणि मनू भागात भारतीय लष्कराने दोन तुकडया पाठवल्या आहेत. प्रत्येक तुकडीमध्ये ७० सैनिक आहेत. आसामध्ये सुद्ध लष्कराला सज्ज राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पोलिसांचे तात्काळ कृती दल आसामच्या दिब्रुगड जिल्ह्यात पाठवले असून संपूर्ण ईशान्य भारतामध्ये निमलष्करी दलाचे ५ हजार जवान तैनात करण्यात आले आहेत.

या विधेयकावरुन भारताच्या ईशान्येकडच्या राज्यांमध्ये मोठया प्रमाणावर अस्वस्थतता आहे. या विधेयक मंजूर झाल्यानंतर अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान या देशातून आलेल्या हिंदुंचा भारतीय नागरीकत्व मिळवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आसाम, त्रिपुरातील आंदोलनामध्ये विद्यार्थी, नागरीक आणि राजकीय नेत्यांचा समावेश आहे. हे सर्व भाजपावर संतप्त आहेत. बाहेरुन आलेल्यांना नागरीकत्व दिले तर आपल्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल अशी त्यांच्या मनात भिती आहे.

तुम्ही ज्या शाळेत शिकलात, आम्ही त्याचे हेडमास्तर
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज राज्यसभेत सादर करण्यात आलं. गृहमंत्री अमित शाह यांनी या विधेयकावर राज्यसभेत निवेदन दिलं. धर्मामुळे त्रास सहन करणाऱ्या नागरिकांना या विधेयकामुळे न्याय मिळेल, असा विश्वास अमित शाह यांनी यावेळी व्यक्त केला. या विधेयकावर चर्चा करण्यासाठी सहा तासांचा कालावधी देण्यात आला होता. यावेळी शिवसेनेनं राज्यसभेत आपली भूमिका मांडली. तुम्ही ज्या शाळेत शिकलात, त्या शाळेचे आम्ही हेडमास्तर आहोत, असं म्हणतं शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला. तसंच मानवतेच्या दृष्टीकोनातून या विधेयकावर चर्चा झाली पाहिजे. यावर व्होटबँकेचं राजकारण करू नये, असंही ते यावेळी म्हणाले.