जम्मू-काश्मीरमधील संचारबंदीची स्थिती आणि सुधारीत नागरिकत्व कायद्यामुळे लाखो मुस्लिम भारत सोडून जाऊ शकतात. त्यामुळे शरणार्थींची नवीन समस्या निर्माण होईल असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. इम्रान खान जिनेव्हामध्ये शरणार्थींच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते.

“आम्हाला फक्त शरणार्थींमुळे निर्माण होणाऱ्या संकटाची भिती नाही तर, दोन अण्वस्त्र संपन्न देशांमध्ये युद्धाची स्थिती उदभवण्याची आम्हाला चिंता आहे” असे इम्रान खान म्हणाले. “आमच्या देशामध्ये आणखी शरणार्थींना सामावून घेण्याची क्षमता नाही. त्यामुळे त्यांनी जगाकडे हस्तक्षेप करण्याची विनंती केली.”

पाच दिवसांपूर्वी इम्रान खान यांनी नरेंद्र मोदी सरकार हिंदू वर्चस्ववादाच्या अजेंडयाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा आरोप केला होता. काही महिन्यांपू्र्वी मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतरही इम्रान खान यांनी असेच युद्धाचे इशारे दिले होते.

इम्रान खान यांना भारताने दिले ‘हे’ सडेतोड उत्तर
नागरिकत्व दुरूस्ती विधेयकावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेल्या टिप्पणीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सडतोड उत्तर देण्यात आले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या प्रत्येक वक्तव्यावर, प्रतिक्रिया देण्याची आम्हाला आवश्यकता वाटत नाही. त्यांची सर्व वक्तव्य चुकीची आहेत, त्यांनी भारताच्या अंतर्गत प्रकरणांवर टिप्पणी करण्यापेक्षा पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांच्या परिस्थितीकडे लक्ष द्यायला हवे. असे भारताचे पराराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी सांगितले आहे.

इम्रान खान यांनी ट्विटद्वारे या विधेयकावर टीका केली होती. भारताच्या नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे आंतरराष्ट्रीय मानवी हक्क कायद्याच्या सर्व नियमांचे तसेच पाकिस्तानसोबतच्या द्विपक्षीय कराराचे उल्लंघन होत असल्याचे त्यांनी म्हटले होते. शिवाय, त्यांनी मोदी सरकार आणि भाजपाची पितृ संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देखील टीका केली होती. नागरिकत्व सुधारणा विधेयक भारताच्या ‘हिंदू राष्ट्र’ संकल्पनेचा भाग आहे असा दावा त्यांनी केला होता.