अवघ्या सातवीत शिकणाऱ्या गुरुग्राममधल्या प्रतिष्ठित शाळेतल्या विद्यार्थ्यानं शिक्षिका व तिच्या मुलीला बलात्कार करण्याची धमकी ऑनलाइन पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. शिक्षिकेची मुलगी त्याच्याच वर्गात शिकते. तर दुसऱ्या एका प्रकरणात याच शाळेतल्या आठवीतल्या एका विद्यार्थ्यानं एका शिक्षिकेला कँडललाईट डिनर व सेक्ससाठी आमंत्रण दिलंय. गेल्या आठवड्यात हे दोन्ही प्रकार घडले आहेत. बलात्काराची धमकी मिळालेली शिक्षका तर शाळेत आलीय, परंतु तिच्या मुलीनं मात्र अद्याप धसका घेतलेला आहे व ती शाळेत येत नाहीये.

या प्रकरणी सखोल तपास करण्यात येत असल्याचं शाळेनं स्पष्ट केलं आहे. अत्यंत आक्षेपार्ह अशा या घटना असून सायबर माध्यमाचा वापर करण्यात येत असल्याचं व शाळा अशा प्रकरणांना पाठिशी घालणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. या प्रकरणी या लहान मुलांना मानसशास्त्रीय उपचारांची गरज असल्यास ते ही करण्यात येणार आहे. दरम्यान, चाइल्ड वेल्फेअर कमिटीच्या अध्यक्षा शकुंतला धुल यांनी पुढाकार घेत या प्रकरणी लक्ष घातलं आहे.

शाळेला व संबंधित विद्यार्थ्यांना नोटीस पाठवण्यात येणार आहे आणि हा सगळा प्रकार काय आहे हे समजून घेण्यात येणार आहे असं त्या म्हणाल्या. शिक्षक तसेच मुलांसाठी मानसशास्त्रीय सल्ला देणारे वर्गही आयोजित करण्यात येतील असे त्या म्हणाल्या.

अर्थात, हा काही अपवादात्मक प्रसंग नसून अन्य शाळांमध्येही असे प्रकार वाढत असल्याचे काही प्रिन्सिपल्सनी सांगितलं. हा एकूण सामाजासाठीच गांभीर्याचाच प्रश्न आहे आणि केवळ शाळा नाही तर एकूण समाजानंच या प्रश्नाचा वितार करायला हवा असं मत काही शिक्षकांनी व्यक्त केलं आहे. मुलं इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं, इंटरनेट व टिव्हीवर नको नको ते बघतात आणि सारासार विचार न करता अशी विघातक विचारसरणी आत्मसात करतात अशी खंत एका शिक्षणतज्ज्ञानं व्यक्त केली आहे. मुलं कुठल्या वेबसाइट्स बघतात याचा पालकांना पत्ताच नसतो असंही आढळून आलं आहे.

मुलांना घरी चांगली वागणूक मिळत नसेल, ते एकलकोंडे असतील व त्यांच्याशी कुणी संवाद साधत नसेल तर असे प्रकार घडू शकतात असं मत एका तज्ज्ञांनं व्यक्त केलं आहे. त्यामुळे मुलांच्या निकोप वाढीसाठी पालकांची भूमिका महत्त्वाची असल्याचं मानसशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. सातवीच्या मुलांनी बलात्काराची धमकी देणं वा टीचकला सेक्ससाठी आमंत्रण देणं हे मुलांचं संगोपन नीट झालं नसल्याचं लक्षण असल्याचं एका तज्ज्ञानं सांगितलं.