दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच कंबर कसली आहे. उत्तराखंड आणि पंजाबनंतर आता गोव्यातही मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि इतर पक्षांना घाम फुटला आहे. गोव्यात २०२२ विधानसभा निवडणुकीत आपचं सरकार आल्यास ३०० युनिट वीज मोफत देण्याची घोषणी त्यांनी केली आहे. गोव्यातील जनतेला आम आदमी पक्षानं चार आश्वासनं दिली आहेत. ही चारही आश्वासनं विजेशी निगडीत आहेत. यावेळी केजरीवाल यांनी काँग्रस आणि भाजपावर निशाणा साधला. जनतेची दिशाभूल करत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दोन दिवसीय गोवा दौऱ्यावर आहेत. यावेळी केजरीवाल यांनी गोव्यातील पक्ष कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

“गोवा सुदंर आहे. मात्र इथलं राजकारण खराब आहे. भाजपा आणि काँग्रेसनं मिळून जनतेची फसवणूक केली आहे. आमचं सरकार गोव्यात आलं तर प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला ३०० युनिट वीज मोफत दिली जाईल. विजेची जुनी बिलं माफ केली जातील. त्याचबरोबर २४ तास वीज उपलब्ध असणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी शेतीसाठी मोफत वीज मिळेल. मी तुम्हाला शब्द दिला आहे आणि मी शब्द पाळतो”, असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं. दिल्लीत केजरीवाल सरकार प्रत्येक कुटुंबाला २०० यूनिट वीज मोफत देत आहे. मात्र गोवा, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये ३०० युनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली आहे.

…म्हणून बर्गर किंग आउटलेटच्या कर्मचाऱ्यांनी दिला सामूहिक राजीनामा!

पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री केजरीवाल यांना नवजोत सिंह सिद्धू यांच्याबाबतही प्रश्न विचारणात आला. त्यावर त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. “मला आनंद आहे की आम आदमी पार्टी चांगलं काम करत आहे. विरोधकही आमच्या पक्षाची स्तुती करत आहेत.” असं उत्तर देत त्यांनी प्रश्नाला बगल दिली. दरम्यान, महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टीचे प्रमुख दीपक धवलीकर आणि त्यांचा भाऊ सुदीन यांनी सोमवारी केजरीवाल यांची रिसॉर्टमध्ये भेट घेतली होती.