आपली मुलगी दुसऱ्या समाजातील तरुणासोबत पळून गेल्याने तामिळनाडूतील कोइंबतूर जिल्ह्यात वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. एस. अकतूर समी (वय ६३) आणि स्वरलता (वय ५३) असे या दाम्पत्याचे नाव आहे.

कोइंबतूर जिल्ह्यातील पोल्लाची येथे समी आणि स्वरलता हे दाम्पत्य राहत होते. या दाम्पत्याला स्नेहा (वय २४) ही मुलगी असून तिचे दुसऱ्या समाजातील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. महाविद्यालयात असल्यापासूनच तिचे प्रेमसंबंध होते. तो मुलगा दुसऱ्या समाजाचा असल्याने हे प्रकरण सुरू ठेवू नकोस, असा सल्ला त्यांनी मुलीला दिला होता. मात्र, आपण त्याच्यासोबत राहायला जात असल्याचे सांगून ही मुलगी शनिवारी सायंकाळी घर सोडून निघून गेली. तिच्या या निर्णयामुळे निराश झालेल्या या दाम्पत्याने राहत्या घरात कीटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केली. रविवारी सकाळी त्या दोघांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले. मुलीचा मोबाईल ‘स्विच्ड ऑफ’ असल्याने नातेवाईक तिच्याशी संपर्क साधू शकले नाहीत.