भगतसिंग यांनी देशासाठी केलेल्या त्यागावर कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित करु शकत नाही, पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्पष्ट केले आहे. तसेच भगतसिंगांबद्दल निर्माण झालेला वाद देशासाठी अतिशय दु:खद असल्याचेही पंतप्रधानांनी म्हटले.
भगतसिंग यांची हुतात्मा असल्याची कोणतीही नोंद नाही, अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने माहिती अधिकाराच्या अंतर्गत दिल्याचे वृत्त काही माध्यमांमध्ये आले होते. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी भगतसिंग हुतात्मा झाले. कुठेही त्याची नोंद असणे किंवा नसणे यावर ही बाब अवलंबून नाही, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले. त्यामुळे या मुद्द्यावर कोणताही नवा वाद निर्माण करु नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.