दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मानहानीकारक पराभव झाल्यानंतर पक्षातील नेतेच आता पक्षाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. काँग्रेसकडे निवडणुकांसाठी चेहराच नसल्याचे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी मान्य केले आहे.

सिब्बल म्हणाले, “आमच्याकडे निवडणुकांसाठी लोकप्रिय नेत्याचा चेहराच नाही. पक्षातील हा एक कळीचा मुद्दा आहे. यामध्ये आम्ही लक्ष घालणार आहोत आणि लवकरच हा प्रश्न सोडवू.” राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. पवार म्हणाले होते, “दिल्लीकरांनी भाजपाला चांगलाच झटका दिला आहे. भाजपाची पराभवाची मालिका आता थांबणार नाही,” असेही पवार म्हणाले होते. “धार्मिक ध्रुवीकरण आणि समाजाच्या विभाजनाचं कार्ड भाजपाच्या मंत्र्यांकडून खेळण्यात आलं होतं. हे आता दिल्लीची आणि देशातील जनता चालू देणार नाही. याच प्रतिबिंब झारखंड आणि छत्तीसगडसारख्या राज्यांमध्येही दिसून आलं आहे,” असे सिब्बल यावेळी म्हणाले.

आणखी वाचा – Delhi Assembly Election 2020 : मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र

“गृहमंत्री अमित शाह यांना आता हे कळायला हवं की, ‘देशातील जनतेमध्ये फूट पाडण्यात आता काहीही अर्थ नाही. त्याचा परिणाम निवडणुकांचे निकाल आणि भारतातील गुंतवणुकीवर पर्यायाने गुंतवणूकदारांच्या आत्मविश्वासावर झालेला दिसून येतो आहे. त्यामुळे दिल्लीप्रमाणे आगामी बिहारच्या निवडणुकांमध्ये देखील भाजपाला याची प्रतिची येईल,” असेही सिब्बल यावेळी म्हणाले.

आणखी वाचा – भाजपाच्या पदरात ‘शाही’ निराशा!; दोन वर्षात सहा राज्यांमध्ये मोठे पराभव

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने दिल्लीतील ७० पैकी ६२ जागा जिंकल्या आहेत. या हायव्होल्टेज निवडणूक कार्यक्रमात भाजपाने अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली अनेक केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्र्यांना पाचारणं केलं होतं.