कर्नाटकातील राजकीय नाट्य सुरू असतानाच गोव्यातील काँग्रेसच्या काही आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश करत काँग्रेसला मोठा धक्का दिला. यातून आता काँग्रेसने धडा घेत राजस्थान आणि मध्य प्रदेशात सावध भूमिका घेत असल्याचे पहायला मिळत आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन्ही राज्यांमध्ये फार कमी फरकाने काँग्रेस बहुमतात आहे. अशातच अपक्ष आमदार आणि अन्य पक्षांच्या समर्थनावर काँग्रेसचे भवितव्य टिकून आहे.

दरम्यान, कर्नाटक आणि गोव्या पाठोपाठ भाजपा मध्य प्रदेशवर आपला मोर्चा वळवेळ या भितीने काँग्रेस नेतृत्व सावध झाल्याचे पहायला मिळत आहे. तसेच मुख्यमंत्री कमलनाथ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग आणि अन्य नेतेमंडळी विरोधी पक्षांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून आहेत. कमलनाथ सरकारचे भवितव्य समाजवादी पार्टी, बसपा आणि काही अपक्ष आमदारांवर टिकून आहे. राजस्थानमध्ये तर अनेक अपक्ष आमदारांनी गेहलोत यांना मुख्यमंत्री करण्याच्या अटीवरच काँग्रेसला समर्थन दिले आहे. यातच काँग्रेसचे राज्यातील नेते पक्षातील सर्वांना एकत्रित ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. परंतु येत्या काळात त्यांच्यासमोरील आव्हाने वाढण्याची शक्यता आहे.

कर्नाटक आणि गोव्यात ज्याप्रकारे आमदारांना आपल्याकडे वळवण्यात आले, तो प्रकार ऑपरेशन लोटसपेक्षा वेगळे असल्याचे काँग्रेसला आता समजले आहे. गोव्यातही अनेक आमदारांनी भाजपाला आपले समर्थन दिले आहे. अशातच गुरूवारी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या खासदारांची संसदेत बैठक पार पडली होती. तर कर्नाटक आणि गोव्यात सुरू असलेल्या राजकीय नाट्याविरोधात काँग्रेसने संसद परिसरात आंदोलनही केले होते. त्यानंतर लोकसभेतही हा मुद्दा गाजला होता.

मध्य प्रदेशातील गणित
2018 मध्ये झालेल्या विधासभा निवडणुकीत काँग्रेसला 114 जागांवर तर भाजपाला 109 जागांवर विजय मिळाला होता. तर बहुमतासाठी 116 चा आकडा गाठणे आवश्यक होते. दोन्ही पक्षांपैकी कोणत्याही पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आला नव्हता. परंतु काँग्रेसला एनसीपीच्या 1, बसपाच्या 2 आणि 4 अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला होता.

राजस्थानचे गणित
राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 100 तर भाजपाला 73 जागांवर विजय मिळाला होता. या ठिकाणी बहुमतासाठी 101 चा आकडा पार करणे आवश्यक होते. परंतु दोन्ही पक्षांना हा आकडा पार करता आला नव्हता. त्यानंतर काँग्रेसला अनेक अपक्ष आमदारांनी गेहलोत यांना मुख्यमंत्री करण्याचा अटीवर काँग्रेसला पाठिंबा दिला होता.