धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते कुमारस्वामी बुधवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून गुरुवारी बहुमत सिद्ध करणार आहेत. दरम्यान जोपर्यंत कुमारस्वामी बहुमत सिद्ध करत नाहीत तोपर्यंत काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांना हॉटेलमधून बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. निकाल लागल्यापासून हॉटेलमध्ये राहणाऱ्या आमदारांना मात्र आता घराची आठवण येऊ लागली आहे.

दोन्ही पक्षांनी रविवारी सकाळी आपापल्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघात पाठवण्याचा निर्णय घेतला होता. १५ मे पासून आमदार आपल्या कुटुंबापासून दूर आहेत. अनेक आमदारांना आपल्या घरी परतण्याची इच्छा असून, आपल्या नेत्यांकडे त्यांनी ती व्यक्तही केली होती. मात्र अचानक पक्षांनी आपला निर्णय बदलत गुरुवारपर्यंत आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बाहेर गेल्यानंतर भाजपा आमदारांना गळाला लावण्याचा प्रयत्न करेल अशी भीती दोन्ही पक्षांना आहे. एकदा तरी आपल्या घरी जाण्याची परवानगी देण्याची आमदारांची मागणीही फेटाळण्यात आली आहे.

काँग्रेसचे आमदार हिल्टॉन हॉटेलमध्ये राहत असून, जेडीएसच्या आमदारांना एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलं आहे.
“जोपर्यंत बहुमत सिद्ध होत नाही, तोपर्यंत आमचे आमदार हॉटेलमध्येच राहणार. सोमवारी पुन्हा एकदा त्यांच्यासोबत बैठक घेणार आहे”, अशी माहिती कर्नाटकमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष परमेश्वरा यांनी दिली आहे.

आपल्या पक्षाला सत्तेत येणं किती गरजेचं आणि महत्वाचं असल्याचं काँग्रेसकडून आमदारांना पटवून देण्यात येत आहे. काँग्रेस नेते सिद्धरमय्या, मल्लिकार्जून खर्गे, डी के शिवकुमार आणि के सी वेणुगोपाल यांनी आमदारांशी चर्चा केली असून पक्षाच्या निर्णयाशी एकनिष्ठ राहण्याचं आवाहन केलं आहे.

“सर्व निर्णय २०१९ लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर घेतले जात असून सर्वांनी त्यादृष्टीने सहकार्य करणं अपेक्षित आहे. भाजपा आपल्या आमदारांना खेचण्याचा प्रयत्न करत असून सर्वांनी काळजी घेतली पाहिजे”, असं शिवकुमार यांनी आमदारांना सांगितलं आहे.