पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने आज ‘भारत बंद’ पुकारला आहे. राज्यातील विविध राजकीय पक्षांनी या बंदला पाठिंबा जाहीर केला असून, जनतेने मोठय़ा संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसकडून करण्यात आलं आहे. २१ विरोधी पक्षांनी भारत बंदला पाठिंबा दिला आहे. सकाळी ९ वाजल्यापासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत बंद पाळण्यात आला. मोदी सरकार जोपर्यंत पेट्रोल आणि डिझेल वस्तू आणि सेवाकरातंर्गत (जीएसटी) आणत नाही, तोपर्यंत काँग्रेससह विरोधी पक्षांचे जनआंदोलन सुरूच राहील, असा इशारा काँग्रेसने आज दिला. पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या निषेधार्थ आज विरोधी पक्षांनी भारत बंद पुकारला आहे. त्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रवक्ते रणदिप सुरजेवाला यांनी मोदी सरकार व भाजपावर हल्लाबोल केला. तर सरकार विरोधकांची एकजुट पाहून घाबरले आहे. आम्ही इंधनाचे दर नियंत्रणात आणू शकत नाही असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. त्यांचे अपयश त्यांच्या याच भूमिकेत दिसून येते असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. या पक्षांचा पाठिंबा ‘भारत बंद’ला राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, डावे पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पक्ष, आ. प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पार्टी, राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी या पक्षांनी जाहीर पाठिंबा दिला.