एकीकडं देश करोनाच्या संकटाला तोंड देत असताना भारत-चीन सीमावादाचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. लडाखमध्ये चीन आणि भारताचे जवान आमनेसामने आले व सीमेवर तणाव निर्माण झाला. याच वादावरून काँग्रेसनं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. अमित शाह याचं २०१४ ट्विट रिट्विट करून शाह, आता बोलतील का?, असा प्रश्न विचारला आहे. चीननं पुन्हा एकदा सीमावादाचा प्रश्न वर काढला आहे. पॅनगॉँग टीएसओ सेक्टरमध्ये पाच-सहा मे रोजी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हाणामारी झाली. त्यामध्ये दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाले. त्यामुळे तिथे अतिरिक्त तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत. लडाखमध्ये चीन-भारताच्या सैन्यामध्ये झटापट झाल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. चीन-भारत सीमावादाच्या प्रश्नावर डोनाल्ड ट्रम्प यांनी भाष्य केल्यानंतर हा मुद्दा देशभरात चर्चेला आला. त्यावरून विरोधकांनी मोदी सरकारवर टीका केली. दरम्यान, अमित शाह यांनी २५ एप्रिल २०१४ रोजी एक ट्विट केलं होतं. या ट्विटचा उल्लेख करत काँग्रेसनं शाह यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. "आता अमित शाह बोलतील का? असा प्रश्न विचारला आहे. Will Sh. Amit Shah speak up now? — Randeep Singh Surjewala (@rssurjewala) June 2, 2020 शाह नेमकं काय म्हणाले होते? २०१४मध्ये देशात लोकसभा निवडणुकीचे वारे सुरू होते. त्यावेळी २५ एप्रिल २०१४ रोजी अमित शाह यांनी त्यांची एक बातमी ट्विट केलं होती. 'जर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, तर पाकिस्तानी घुसखोर सीमा ओलांडण्याचं धाडसही करणार नाही' अशा मथळ्याची ती बातमी होती. या बातमीबरोबरच "चीनचे सैन्य त्यांना हवं तेव्हा भारतीय हद्दीत येतं आणि पिकनिक करते. पण आपलं सरकार काहीही करत नाही," असं शाह यांनी ट्विटमध्ये म्हटलेलं आहे.